Water Crisis:राज्यावर तीव्र पाणीटंचाईचे संकट, सर्व धरणांत मिळून फक्त 22 टक्के पाणीसाठा, अनेक शहरांत पाणीकपातीची शक्यता

| Updated on: Jun 28, 2022 | 9:44 PM

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Water Crisis:राज्यावर तीव्र पाणीटंचाईचे संकट, सर्व धरणांत मिळून फक्त 22 टक्के पाणीसाठा, अनेक शहरांत पाणीकपातीची शक्यता
Water crisis in Maharashtra
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई- राज्यात सध्या अस्थिर राजकीय स्थिती असली, तरी सत्तेसोबतच सर्वात मोठे संकट उभे आहे. आगामी काळात राज्याला पाणी संकटाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे. असमाधानकारक पडत असलेला पाऊस (Rain Shortage)आणि त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांचा आढावा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting)खरीप हंगामाचा गांभिर्याने आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

राज्यातील पाणीसाठा केवळ 22 टक्क्यांवर

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. येत्या काळात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचे तीव्र संकट संपूर्ण राज्यात उभे राहण्याची शक्यता आहे. याबाबतच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (29 जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत. आगामी काळात काही शहरांतील पाणी पुरवठ्यात कपात केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

यंदा कमी पाऊस पडेल,तज्ज्ञांचा अंदाज

यावर्षी देशात कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला ला निना स्थितीवरुन देशात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हिंद महासागरात दिध्रुव स्थिती पाहता यंदा देशात मान्सूनचे प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात कमी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

राज्यात 496 टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात 27 जूनअखेर 610 गावे आणि 1266 वाड्यांना 496 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 66 तर खाजगी टँकर्सची संख्या 430 इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत 31 ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत 24 ने आणि वाड्यावस्त्यांच्या संख्येत 130 ने घट झालेली आहे.