आनंद परांजपे यांची मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका, परांजपे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज…

| Updated on: Nov 30, 2022 | 5:59 PM

अशा माणसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे याच्यापेक्षा घाणेरडे राजकारण या महाराष्ट्राने पाहिलेले नाही.

आनंद परांजपे यांची मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका, परांजपे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज...
आनंद परांजपे
Follow us on

ठाणे – माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारांशी तुलना सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून स्वत:ची सुटका करून रयतेचे राज्य स्थापन केले होते. त्यांनी कधीच आपल्या सहकार्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता. त्यामुळे हिंदुत्व आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जात असेल तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मंगलप्रभात लोढा यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. आनंद परांजपे म्हणाले की, संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपचे नेते करीत आहेत.

मंगलप्रभात लोढा हे जरी संविधानिक पदावर असले तरी महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती, शिवरायांच्या बद्दल त्यांच्या मनात असलेली आस्था याबद्दल मला शंका आहे. अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

महाराजांनी आदिलशाही, निजामशाही, मोघल या तिन्ही सत्ताधीशांच्या विरोधात लढाया करुन रयतेचे, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. पण, हे घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्रातून पळाले. सुरतला गेले, सुरतहून गुवहाटीला गेले. गुवाहाटीवरुन गोव्याला गेले अन् नंतर महाराष्ट्रात परतून मुख्यमंत्री झाले. त्यांनी हिंदूत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप आनंद परांजपे यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा माणसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे याच्यापेक्षा घाणेरडे राजकारण या महाराष्ट्राने पाहिलेले नाही. म्हणून मंगलप्रभात लोढा यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असंही ते म्हणाले.