ठाणे: ठाण्यात ठिकठिकाणी बंद सुरू असतानाच पोलिसांनी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांशी हुज्जत घातली म्हणून रिक्षा चालकाला पोलिसांनी त्याला व्हॅनमध्ये घालून बेदम मारहाण केली. यावेळी माध्यमांना चित्रीकरण करण्यापासूनही रोखण्यात आलं. त्यामुळे या घटनेवर ठाण्यात संताप व्यक्त केला जात आहे.
ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बंद पुकारला. त्यामुळे सकाळपासूनच ठाण्यात दुकाने बंद होती. वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरू होती. त्यावेळी एक रिक्षा चालक रस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालत होता. त्यामुळे पोलिसांनी या रिक्षा चालकाला पोलीस व्हॅनमध्ये टाकले आणि त्याला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कॅमेऱ्यावर हात ठेवून हे चित्रीकरण थांबवले.
दरम्यान, ठाण्यात आज सकाळपासून बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. ठाण्यात सकाळपासून परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. इतर वाहनेही रस्त्यावर दिसत नसल्याने ठाणेकर प्रवाशी चांगलेच वैतागले होते. या शिवाय ठाण्यातील दुकानेही बंद होती. तर तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध करत होते.
पालघर जिल्ह्यात डहाणू, कासा ,तलासरी, चारोटी इत्यादी भागातही कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. लखीमपुरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाजारपेठ व्यापारी वर्गाने बंद ठेवत उत्फुर्त प्रतिसाद दिला. तलासरी, डहाणू भागात बाजार पेठ, भाजी मार्केट कडकडीत पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतिल शिवसेना ,काँग्रेस तसेच डाव्या आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करत भाजप विरोधी घोषणा दिल्या. यावेळी पालघरचे सेनेचे आमदार श्रीनिवास वणगा, तलासरी पंचायत समिती सभापती नंदकुमार हाडळ, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रामू पागी, माकप जिल्हा सेक्रेटरी बारक्या मांगात यांनी रस्त्यावर उतरत केंद्राचा विरोधात निषेध व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वसई रोड रेल्वे स्टेशन परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करुन रस्ता रोको करण्याचा केला प्रयत्न. यावेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माणिकपूर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले.
मुंबईतही आज बेस्टची वाहतूक रस्त्यावर तुरळक प्रमाणात धावत होती. बेस्ट बसेसवर दगडफेक झाल्याने बेस्ट प्रशासनानं पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. पोलीस संरक्षण मिळाले की बेस्ट सेवा पूर्ववत केली जाणार आहे. आतापर्यंत 8 बेस्ट गाड्यांची तोडफोड झाली आहे. धारावी, शिवाजी नगर, देवनार, मालवणी येथे बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 October 2021 https://t.co/JiV975Anuo #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Bandh : लोकल, रेल्वे सेवा सुरु; खाजगी वाहतूक बंद, वाचा राज्यात काय सुरु, काय बंद?
(thane police beating rickshaw driver during maharashtra bandh)