Bharat Bandh: भारत बंदचा कोणावर परिणाम, कोणत्या सेवा बंद राहणार, वाचा सविस्तर

| Updated on: Feb 26, 2021 | 8:00 AM

भारत बंदचा फटका कोणाला बसणार, कोणत्या सेवा ठप्प होणार | bharat bandh updates

Bharat Bandh: भारत बंदचा कोणावर परिणाम, कोणत्या सेवा बंद राहणार, वाचा सविस्तर
नागपूर बंद
Follow us on

नवी दिल्ली: देशातील वाहतूक आणि मजूर संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली होती. या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (SKM) शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे वस्तू आणि सेवा कराच्या (GST) तरतुदींमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशननेही (CAIT) आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. (Bharat Bandh by Transport unions and traders)

भारत बंदमुळे कोणत्या सेवा बंद राहणार?

1. भारत बंदमध्ये देशातील 40 हजारापेक्षा जास्त व्यापारी संघटना सहभागी होणार असल्याने बहुतांश बाजारपेठा बंद असतील. मात्र, स्थानिक स्तरावर याची अंमलबजावणी कितपत होणार, याबद्दल अद्याप साशंकता आहे.

2. देशातील अनेक भागांमध्ये वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. AITWA ने वाहतूक कंपन्यांना सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत आपल्या गाड्या पार्क करण्याचे आवाहन केले आहे.

3. बुकिंग आणि बीलासंदर्भातील व्यवहार ठप्प होऊ शकतात.

4. चार्टर्ड अकाऊंटस आणि टॅक्स अ‍ॅडव्होकेट संघटनांनीही भारत बंदचे समर्थन केले आहे. त्यामुळे या सेवांवर परिणाम होईल.

5. CAIT चे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या माहितीनुसार महिला उद्योगगट, फेरीवाले आणि अन्य लहान व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

6. तसेच GST मधील त्रुटींचा विरोध करण्यासाठी कोणताही व्यापारी आज पोर्टलवर लॉग इन करणार नाही.

कोणत्या सेवांवर परिणाम होणार नाही?

1. भारत बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दूध आणि भाज्यांचा पुरवठा सुरळीत राहील.

2. बँकिंग सेवेवरही या बंदचा कोणता परिणाम होणार नाही.

जीएसटी परिषदेने आपल्या हितासाठी जीएसटीला विकृत रुप दिले

जीएसटी परिषदेने आपल्या हितासाठी जीएसटीला विकृत रुप दिल्यामुळे ही प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप खंडेलवाल यांनी केलाय. जीएसटीच्या मुळ स्वरुपाशी छेडछाड करण्यात आलीय. सर्व राज्य सरकारांना केवळ आपल्या वैयक्तीक स्वार्थ साधायचा आहे. त्यांना कर प्रणालीच्या सुसुत्रीकरणाची कोणतीही काळजी नाही. व्यापारी व्यापार करण्याऐवजी जीएसटीचे पालन करण्यातच गुंतलेले आहेत.

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले नाही. त्यामुळे जीएसटीच्या वर्तमान स्वरुपाबाबत पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे खंडेलवाल म्हणाले. ‘कॅट’ने वारंवार उपस्थित केलेल्या मुद्यांची जीएसटी परिषदेने दखल घेतली नाही. त्यामुळे आपले म्हणने देशासमोर मांडण्यासाठी भारत व्यापार बंदचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

(Bharat Bandh by Transport unions and traders)