भिवंडी (ठाणे) : भिवंडी शहरातील धामणकर नाका या उड्डाणपूला जवळून अपहरण करण्यात आलेल्या 1 वर्षाच्या चिमुरड्याची उत्तरप्रदेशातून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. आशिष चंदूल हरिजन असे या लहान मुलाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
उत्तरप्रदेशातील फैजाबादमध्ये राहणारे चंदूल रामप्यारे हरिजन अवघ्या काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि 1 वर्षीय मुलासह रोजगाराच्या शोधासाठी भिवंडीत आले होते. राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी धामणकर नाका येथे उड्डाणपुलाखाली आपले बस्तान बसवले होते. त्यानतंर चंदूल यांनी बूटपॉलिशचा रोजगार सुरु केला. या उड्डाणपूलाखाली हरियन परिवार 2 जूनला रात्री झोपले असताना, अचानक अज्ञाताने रेणू हरिजन यांच्या कुशीतून बाळाला उचलले. त्याच्या अंगावर गोणपाट लपटून त्याचे अपहरण केले. पहाटे 4 च्या सुमारास रेणूला जाग आली असता, तीने आपल्या कुशीतील बाळ गायब असल्याचं पाहिले. तिने आजूबाजूला शोधाशोध केली असता, तिला आशिष कुठेही दिसला नाही.
त्यानंतर हरियन पती-पत्नींनी भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारानुसार पोलिसांनी भिवंडी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना बाळ पळवून नेत असताना तीन जण दिसले. त्यानंतर एका गुप्तहेराकडूंन त्यांना त्या आरोपींचा फोन नंबर मिळाला. फोन नंबरच्या आधारे पोलिसांना ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले.
यानंतर भिवंडी पोलिसांनी उत्तप्रदेशातील गोरखपूर या ठिकाणाहून एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चिमुरड्या आशिषची सुटका करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आशिषला कुटुंबियांच्या सुपूर्द केले आहे. मुलगा परत मिळाल्याने आईवडील आनंदित असून त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.