Sharad Pawar : जिथं सत्ता नव्हती तिथं आणली गेली, शरद पवारांचा भाजपवर निशाणा; सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा घणाघाती आरोप

| Updated on: Aug 23, 2022 | 5:57 PM

अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबतही पवार यांनी संताप व्यक्त केलाय. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्यानं भाजपची हुकुमत आल्याची खोचक टीका पवार यांनी केलीय.

Sharad Pawar : जिथं सत्ता नव्हती तिथं आणली गेली, शरद पवारांचा भाजपवर निशाणा; सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा घणाघाती आरोप
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार जाऊन शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात नवं सरकार आलं आहे. या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांवर फेरविचाराला सुरुवात केलीय. महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजप सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबतही पवार यांनी संताप व्यक्त केलाय. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्यानं भाजपची हुकुमत आल्याची खोचक टीका पवार यांनी केलीय.

‘देशात सत्तेचा गैरवापर सुरु’

शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पवार म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहित होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. अशा पद्धतीने आज देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरवापर केला जातोय. आज हुकुमत त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली. त्यांच्यावर 100 कोटींचा आरोप करण्यात आला. शिक्षणासाठी 100 कोटी घेतले तरी त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली. नंतर ती रक्कम 4 कोटी झाली, नंतर 1 कोटी झाली, अशा शब्दात पवार यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवला.

‘ईडी, सीबीआयला सोबत घेऊन सध्या काम केलं जातं’

नवाब मलिक यांची काय चूक होती? 20 वर्षांपूर्वी काही व्यवहार झाला होता. दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई होत आहे. चुकीचं काम केलं तर आमचं समर्थन नाही. केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर होतोय. ईडी, सीबीआयला सोबत घेऊन सध्या काम केलं जात आहे. आज देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांजवळ आज बहुमत आहे. पण हे उचित बहुमत नाही. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. तिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रात भाजपची हुकुमत नव्हती. मात्र शिवसेनेचे आमदार गेल्याने महाराष्ट्रात भाजपची हुकुमत आली, असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.