झारखंड – झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. झारखंडचा सर्वात उंच रोपवे आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्रिकूट रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळली. त्यामुळे लोक टेकडीवर अडकले आहेत. एनडीआरएफने (NDRF) रात्री उशिरापासूनच बचावकार्य सुरू केले. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत लोकांना सुखरूप परत आणता आले नाही. झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृ्त्यू आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
रविवारी रामनवमीनिमित्त शेकडो पर्यटक येथे पूजा करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी दाखल झाले होते. रोपवेची एक ट्रॉली खाली येत होती.त्यावेळी वरती जाणारी ट्रॉली धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झाले आहेत. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे 24 ट्रॉल्या हवेत होत्या. घाईघाईत अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अपघात होऊन 20 तास उलटले तरी अजून 48 जण हवेत लटकले आहेत. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचले. परंतु हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे 18 ट्रॉली हलू लागल्या आहेत. त्यामध्ये ट्रॉलीत असलेल्या लोकांच्या जीवावर बेतले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तासाभराच्या प्रयत्नानंतरही बचाव पथकाला यश मिळालेले नाही. हेलिकॉप्टरमधून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या लोकांना ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी दिले जात आहे. ट्रॉलीमध्ये लहान मुले, पुरुष आणि काही महिला अडकल्या आहेत. यासोबतच मार्गदर्शक आणि छायाचित्रकारही अडकले आहेत.’सध्या रोप वे बंद आहे, ट्रॉलीच्या प्रदर्शनामुळे हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी एनडीआरएफसह लष्कराची मदत घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करू नका अशी माहिती जिल्हाधिकारी मंजुनाथ भाईजंत्री यांनी दिली.