Republic Day 2022: संविधान तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी काय इशारा दिला?; संविधानसभेतील अखेरचं भाषण काय?

| Updated on: Jan 26, 2022 | 7:17 AM

Republic Day 2022: संविधान (constitution) कितीही चांगलं असलं तरी ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.

Republic Day 2022: संविधान तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी काय इशारा दिला?; संविधानसभेतील अखेरचं भाषण काय?
Dr. BR Ambedkar's last speech to the Constituent Assembly
Follow us on

नवी दिल्ली: संविधान (constitution) कितीही चांगलं असलं तरी ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr. b. r. ambedkar) यांनी संविधान सभेत दिला होता. 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. मात्र त्याच्या स्वातंत्र्याचं भविष्य काय असेल? अशी चिंताही बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. देशातील वातावरण, देशाचा विकास, जातीप्रथा, गरीबी या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रजासत्ताक दिनी (Republic Day)  बाबासाहेबांच्या या इशाऱ्याची प्रत्येक भारतीयांना जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

25 जानेवारी 1949 रोजी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत भाषण झाले होते. या भाषणात त्यांनी भारत राष्ट्र म्हणून कसं असेल, संविधान अस्तित्वात आल्यानंतरचा भारत कसा असेल, आपल्या जबाबदाऱ्या काय असतील आणि देश म्हणून आपली कर्तव्य काय असतील यासह संविधानाचं अस्तित्व आणि लोकशाही प्रणालीवर भाष्य केलं होतं. या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठाच अधोरेखित झाली होती. या भाषणात त्यांनी काही गोष्टींचे इशारे दिले होते, तर काही बाबींवर चिंताही व्यक्त केली होती.

आपण पुन्हा स्वातंत्र्य गमावू?

26 जानेवारी 1950 रोजी लोकशाहीवादी देश बनेल. त्या दिवसापासून भारतात लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरीता चालवलेले सरकार अस्तित्वात येईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. भारत आपलं हे संविधान टिकवून ठेवेल की पुन्हा आपलं स्वातंत्र्य गमावून बसेल? माझ्या मनात येणारा हा दुसरा प्रश्न आहे. आणि हा सवालही पहिल्या प्रश्ना एवढाच चिंताजनक आहे, असंही डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.

भविष्यातील राजकीय पक्षांचा व्यवहार कसा असेल?

आज आपलं मानस अलोकशाहीवादी आहे. तर आपली राज्य प्रणाली लोकशाहीवादी आहे. अशावेळी भारतातील लोकांचा आणि राजकीय पक्षांचा भविष्यातील व्यवहार कसा असेल हे कसं सांगता येईल?, असा सवालही त्यांनी केला होता.

देशापेक्षा धर्माला अधिक महत्त्व नको

सर्व भारतीयांनी आपल्या देशाला धर्म आणि पंथापेक्षा पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. पंथाला देशावर ठेवू नये, हेच सर्व समस्यांचे उत्तर आहे. राजकीय पक्षांनी देशापेक्षा पंथाला अधिक महत्त्व दिल्यास आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकतं. किंबहुना ते संपुष्टात येऊ शकतं, अशी त्यांना भीती होती. त्यामुळेच त्यांनी संविधान सभेत भविष्यातील भारतावर चिंता व्यक्त केली होती.

 

संबंधित बातम्या:

Padma Award 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा, सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान

Padma Award 2022 : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला पद्म श्री, तर देवेंद्र झाझरीयाला पद्म भूषण पुरस्कार जाहीर

सुलोचना चव्हाण ते सायरस पुनावाला… पद्म पुरस्कारात ‘जय महाराष्ट्र’!