कॅन्सरचं निदान, शस्त्रक्रिया अन् लोकसभा निवडणुकीचा प्रचार, शरद पवारांनी कॅन्सरशी दोन हात कसे केले?

| Updated on: Dec 12, 2022 | 2:57 PM

शरद पवारांनी कॅन्सरशी झुंज कशी दिली? वाचा...

कॅन्सरचं निदान, शस्त्रक्रिया अन् लोकसभा निवडणुकीचा प्रचार,  शरद पवारांनी कॅन्सरशी दोन हात कसे केले?
Follow us on

मुंबई : 2004 हे साल शरद पवारांच्या (Sharad Pawar Birthday) आयुष्यात एक नवं संकट घेऊन आलं. आजपर्यंत अनेक राजकीय संकटांना चकवा देत आपलं अस्तित्व भक्कमपणे आणि तितक्याच ताकदीनं पुन्हा राजकीय पटलावर उमटवणाऱ्या पवारांसमोर आता मात्र अनपेक्षित संकट उभं राहिलं होतं. हे संकट होतं, कर्करोगाचं… कॅन्सर नाव ऐकूनही अर्ध अवसान गळून जातं. अशावेळी आता काहीच उरलेलं नाही, असं वाटू लागतं. पण अशा या गंभीर आजाराचं निदान होताच पवारांची प्रतिक्रिया त्यांच्या स्वभावाला साजेशीच होती. काहीही झालं तरी या आजाराशी आपण दोन हात करायचे आणि लवकरात लवकर बरं व्हायचं हा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar Cancer Surgery) केला.

शरद पवारांना जडलेला आजार जेवढा गंभीर होता तितकीच त्यावरील उपचार पद्धती जटील होती. पण या सगळ्याने हरतील ते पवार कसले!

शस्त्रक्रिया आणि उपचार

2004 ची लोकसभा निवडणूक तोंडावर होती. अशातच पवारांच्या डाव्या गालाला आतील बाजूने गाठ आली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याची तपासणी केली असता त्यांना कर्करोग झाला असल्याचं निदान झालं. लगोलग शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्रक्रियेवेळी पवारांची सगळी शारिरिक शक्तीपणाला लागली होती. त्यांच्या डाव्या गालाचा सगळा भाग काढून टाकण्यात आला होता. तिथं मांडीची त्वचा लावण्यात आली होती. त्यांचे दातही काढण्यात आले होते.

शस्त्रक्रियेनंतरचे पुढचे आठ दिवस अत्यंत जिकीरीचे होते. त्या आठ दिवसात त्यांना निवडणुकीची कामं तर सोडाच पण साधं जेवण करणंही मुश्किल झालं होतं. अगदी पाणी प्यायचं म्हटलं तरी असह्य वेदना व्हायच्या. भूल देऊनच त्यांना पाणी द्यावं लागायचं. आठ दिवस शस्त्रक्रियेमुळे त्यांना तोंड मिटायचीही परवानगी नव्हती. त्यासाठी त्यांच्या तोंडात बॉलच्या आकाराचा बोळा ठेवण्यात आला होता. अवघ्या काही मिनिटात रक्ताने रुमाल माखायचा. अशातूनही पवार उभे राहिले. शस्त्रक्रिया आणि त्यानंतरचे अति धोक्याचे दिवस संपताच त्यांनी पुन्हा निवडणूक प्रचारात स्वत: ला गुंतवून घेतलं. पण पुढेही पवारांवरील हे उपचार सुरुच राहिले. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर केमोथेरपी केली जात असे. यावेळी शस्त्रक्रिया केल्याच्या बाजूचा भाग सुईने जाळला जायचा. यामुळे त्यांचे ओठ, जीभ, तोडंही जळायचं. पुढे त्यांनी अमोरिकेतही उपचार घेतले.

पुन्हा ऑपरेशन आणि काही दिवसातच ठणठणीत!

पवार दिल्लीतील त्यांच्या दिल्लीतील घरी खुर्चीतून पडले. त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. पायाच्या खुब्याचा बॉल क्रॅक झाला. ऑपरेशननंतर तो पुन्हा बसवण्यात आला. पण पुढचे काही महिने अतरिक्त काळजीचे असल्याचं सांगण्यात आलं. काही महिने चालता येणार नाही. शिवाय काठीचा आधार घेण्याचा सल्ला देण्यात आला. पण पवार अवघ्या 12-15 दिवसात चालायला लागले. अन् काठीचा आधारही नाममात्रच राहिला.

हे सारं येतं कुठून?

एवढी सारी शक्ती, सकारात्मकता पाहिल्यावर हे सारं येतं कुठून असाच प्रश्न साऱ्यांना पडतो. तर त्याचं उत्तर पवारांच्या मनी असलेल्या उद्दिष्टात दडलेलं आहे. सतत समाजाभिमुख कार्य करण्याची उर्मी आणि लोकांसाठी सतत काही नवं करण्याचा ध्यासच त्यांना हे बळ देत असावं. महाराष्ट्रातील एखाद्या भागात गेल्यावर तिथल्या शेतीत काय पिकतंय? तरूण कुठल्या रोजगाराला प्राधान्य देत आहेत? तिथले स्थानिक प्रश्न काय? ते कसे मार्गी लावता येतील? कुठला उद्योग सुरु करता येईल? याचा विचार करणाऱ्या पवारांना हीच माती वारंवार खुणावते. म्हणूनच कितीही दुर्धर आजार असेल तरी त्या आजारापेक्षा पवारांची काम करण्याची उर्मी उजवी ठरते आणि पवार या आजारांना हरवून पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या ताकदीने उभे राहतात.

आपल्याला झालेला आजार किती गंभीर आहे, याची जाणीव पवारांना पुरेपुर असते. पण हा आजार आपल्यापेक्षा बलवान नाही, हेही पवार जाणतात. जेव्हा केव्हा काही आजार जडतो तेव्हा सक्तीचा आराम वगळता ते त्यांच्या कार्यलयातच भेटतील.सरकारी कामाच्या फायली, लोकांचा राबता, त्यांचे प्रश्न, त्यांची कामं, नेते-पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्यी लगबग यामध्येच रमणं म्हणजे पवारांचा सर्वात प्रभावशाली औषधोपचार आहे. हेच टॉनिक त्यांना आजाराशी दोन हात करण्याचं आणि जगण्याचं बळ-सामर्थ्य देतं.