
असं म्हटलं जातं की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. पाणी पिण्याबाबतही हे लागू होतं. पाणी हे आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असतं आणि प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात पुरेसं पाणी पिणंही गरजेचं असतं. मात्र जास्त पाणी पिण्याचे काही दुष्परिणामही असतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?

जेव्हा तुम्ही खूप जास्त पाणी पिता तेव्हा वॉटर पॉयझनिंग, इंटॉक्सिकेशन किंवा मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होणे, असे अनुभव येऊ शकतात. जेव्हा पेशींमध्ये अधिक पाणी असते, तेव्हा सूज आल्याने असे होते. म्हणूनच आपल्या गरजेनुसार पाणी प्यावे असा सल्ला सर्व आरोग्य तज्ज्ञ देतात.

जेव्हा मेंदूच्या पेशी फुगतात तेव्हा दबाव निर्माण होतो. त्यामुळे गोंधळ निर्माण होणे, डोकेदुखी यासारख्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो. हा दाब वाढला तर त्यामुळे हाय ब्लडप्रेशर आणि हृदयाची गती कमी होणे यांसारखे आजार होऊ शकतात.

ओव्हरहायड्रेशनमुळे सोडियम इलेक्ट्रोलाइटवर सर्वाधिक परिणाम होतो, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती उद्भवू शकते. सोडियम हा एक महत्त्वाचा घटक आहे जो पेशींच्या आत आणि बाहेर असणाऱ्या द्रवाचे संतुलन राखण्यास मदत करतो.

शरीरात जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे त्याची पातळी घसरते तेव्हा द्रव पेशींच्या आत पोहोचतात. त्यानंतर पेशी फुगतात, ज्यामुळे चक्कर येणे, कोमात जाणे किंवा मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो.