Photo Gallery : ‘ते’ दोन तास अन् शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकणाचूर, कांदा नगरीत झालं तरी काय?
लासलगाव : कांद्याचे दर जसे लहरी असतात त्याहून कित्येक पटीने यंदा निसर्गाने त्याचा लहरीपणा दाखवलेला आहे. आता कुठे सर्वकाही स्थिर स्थावर होत होते. गेल्या महिन्याभरापासून अवकाळीचे संकट दूर झाल्याने बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागला होता. द्राक्ष बागा अंतिम टप्प्यात तर उन्हाळी हंगामासह खरिपातील कांदा काढणीची कामे जोमात सुरु होती. असे असतानाच पुन्हा निसर्गाने अवकृपा दाखवलेली आहे. कांद्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगावात अवकाळी पाऊसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीपिकांचे तर नुकसान झाले आहे पण सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसलेला आहे. दरवर्षी दरातील चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे उत्पादन पदरी पडण्यापूर्वीच बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.

दुष्काळात तेरावा : एकीकडे कांद्याची आवक वाढत असल्याने बाजारपेठेतील दर घसरु लागले आहेत. तर दुसरीकडे एका रात्रीतून शेत शिवारचे चित्रच बदलत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार झालेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. काढणीच्या प्रसंगीच शेतामध्ये पाणी साचल्याने कांदा नासण्याची भीती व्यक्त होत आहे.

हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला : केवळ खरीप हंगामातच निसर्गाचे दुष्टचक्र होते असे नाही ते रब्बी हंगामातही सुरु आहे. याची तीव्रता कमी असली तरी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक संकट हे पाचवीलाच पुजल्यासारखे झाले आहे. यापुर्वी द्राक्ष बागांचे नुकसान झाले आता रब्बी पिकांची तीच अवस्था झालेली आहे. कितीही नियोजन केले तरी निसर्ग तोंडचा घास हिसकावतच आहे.

रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान: खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा कायम आहे. यापूर्वी झालेल्या पावसातून शेतकऱ्यांना सावरण्याची संधी होती पण आता अंतिम टप्प्यात पिके असताना झालेल्या पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. यामध्ये कांदा, द्राक्ष बागांबरोबरच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी काळवंडणार तर गव्हाच्या लोंब्या जमिनदोस्त झाल्या आहेत.

आता पुन्हा मदतीकडे डोळे: गेल्या वर्षभरात प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी केवळ नुकसानच पडलेले आहे. अवकाळी, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली शिवाय जे पदरी पडले त्याचा दर्जा नसल्याने अपेक्षित दर मिळाला नाही. आता रब्बी हंगामातील पिके बहरात होती तर अवकाळीच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे.

द्राक्ष जमिनदोस्त : वादळी वाऱ्यामुळे लासलगाव परिसरात द्राक्ष बागा ह्या जमिनदोस्त झाल्या आहेत तर द्राक्ष हे चिखलात माखलेले आहे. त्यामुळे वर्षभर केलेली जोपसणा आणि आता झालेली पिकांची अवस्था त्यामुळे उत्पादन आणि झालेला खर्च कसा ताळमेळ लावावा हाच प्रश्न आहे.