शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 10 मुद्दे

| Updated on: Nov 23, 2019 | 2:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar on government Formation) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 10 मुद्दे
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar on government Formation) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवार यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं. पवारांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

शरद पवार म्हणाले, “आम्ही तीनही पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. आमच्याकडे संख्याबळ आहे. अजित पवारांनी जे केलं ते योग्य नाही. अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल. मात्र, तो निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल.”

शरद पवार यांच्या बैठकीतील महत्त्वाचे 10 मुद्दे

  1. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अपक्ष आमदार असे मिळून आमदारांची संख्या 169-170 च्या आसपास जाते.
  2. अजित पवारांचा निर्णय शिस्तभंगाची कारवाई करावी असा निर्णय आहे. अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल. मात्र, तो निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल.
  3. जे आमदार गेले आहेत आणि जे जाणार असतील त्यांनी आपल्या देशात पक्षांतर बंदी कायदा आहे हे लक्षात ठेवावं. त्यामुळे आमदारांचं सर्व विधीमंडळ एकत्र जाण्याची शक्यता आहे. जनमानस पाहता राज्याचा सर्वसामान्य माणूस यांना कधीही पाठिंबा देणार नाही.
  4. आम्ही माहिती घेतल्यानंतर त्यांच्यासोबत 10 ते 11 आमदार असल्याची माहिती आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही आमदारांनी आमच्याशी संपर्क करायला सुरुवात केली.
  5. प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांच्या सह्या घेऊन ते पत्र आपल्याकडे ठेवली होती. माझ्याकडे देखील तशी यादी होती. यातील 2 यादी अजित पवारांनी कार्यालयातून घेतल्या. त्याच यादी त्यांनी राज्यपालांना दिल्या असाव्यात.
  6. कार्यालयीन उपयोगासाठीच्या सह्यांच्या आधारे सरकार स्थापन झालं असेल, तर राज्यपालांची चूक होण्याची शक्यता आहे. त्यावर 54 सह्या होत्या. मात्र, त्या कार्यालयीन कामासाठी होत्या, पाठिंब्यासाठी नाही. तरीही त्यांनी राज्यपालांना पाठिंबा असल्याचं भासवत ते पत्र सादर केलं असावं.
  7. राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्यासाठी सांगितलं आहे. त्यादिवशी त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करु.
  8. सरकारचं नेतृत्व शिवसेनेने करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, कोणत्याही परिस्थिती आम्ही सोबत राहू.
  9. अजित पवार असा निर्णय घेतील असं वाटलं नव्हतं. मला कुटुंबाची काळजी वाटत नाही. मी या परिस्थितींमधून गेलेलो आहे. 1980 मध्ये 58 आमदार निवडून आले होते. त्यावेळी अनेक आमदार सोडून गेले, केवळ माझ्यासह 6 शिल्लक राहिले. त्यावेळी सोडून गेलेले सर्व आमदार पराभूत झाले.
  10. सुप्रिया सुळेंच्या नावाचा यात काहीही संबंध नाही. त्या संसदेच्या सदस्य असून राष्ट्रीय स्तरावर काम करतात.