लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यात सरासरी 61.30 टक्के मतदान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 61.30 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाकडून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 61.30 टक्के मतदान […]

लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यात सरासरी 61.30 टक्के मतदान
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 61.30 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाकडून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 61.30 टक्के मतदान झाले. यात जळगाव – 58.00 टक्के, रावेर – 58.00 टक्के, जालना – 63.00 टक्के, औरंगाबाद – 61.87 टक्के, रायगड – 58.06 टक्के, पुणे – 53.00 टक्के, बारामती – 59.50 टक्के, अहमदनगर – 63.00 टक्के, माढा – 63.00 टक्के, सांगली – 64.00 टक्के, सातारा – 57.06 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 62.26 टक्के, कोल्हापूर – 69.00 टक्के, हातकणंगले – 68.50 टक्के मतदान पार पडले. तर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 14 मतदार संघात 62.88 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याने ते तात्काळ बदलून देण्यात आले. आज झालेल्या 14 मतदारसंघात एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी 28 हजार 691 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सोय करण्यात आली होती. या मतदारसंघातील 3 हजार 825 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. या सर्व मतदार केंद्रात 1 लाख 54 हजार कर्मचारी या कार्यरत होते. तर 90 मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या तर चार मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारीही कार्यरत होते.

सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांचा चांगल्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून आला. सुरुवातीला मॉक पोलमध्ये ईव्हीएम नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ ते बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस दिवसभरात एकूण 334 बॅलेट युनिट (बीयू) आणि 229 सेंट्रल युनिट (सीयू) तर 610 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मतदान यंत्र बदलून देण्याकरिता 14 मतदार संघांमध्ये एकूण 2 हजार 280 वाहने ठेवण्यात आली होती. ही वाहने जीपीएसद्वारे ट्रॅक केली जात होती. त्यामध्ये राखीव यंत्र ठेवण्यात आले होते. मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या ते बदलण्याकरिता या वाहनांचा वापर करण्यात आला. सुमारे 15 ते 20 मिनिटांच्या आत मशिन बदलण्यात आले असून त्यामुळे मतदानात कोठेही खंड पडला नाही, असे दिलीप शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील 14 मतदार संघात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार होते. त्यापैकी 1 कोटी 33 लाख 19 हजार पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार महिला मतदार आणि 652 तृतीय पंथी मतदार होते. रावेर मतदार संघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत अमोल सुरवाडे या मतदाराने संशय व्यक्त केला होता. त्यावर मतदान केंद्राध्यक्षांनी तांत्रिक बाब पूर्ण करण्याकरिता सर्वांसमक्ष मतदानाची चाचणी घेतली. त्यात सुरवाडे यांनी घेतलेल्या संशयात तथ्य न आढळल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

मतदान केंद्रांमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉन यंत्र नेण्याची परवानगी नाही तो कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र औरंगाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने टीक टॉक ॲपवर मतदान प्रक्रियेचे लाईव्ह चित्रीकरण पोस्ट केले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत झालेल्या एका सभेत सहायक पोलीस आयुक्त नरसिंग यादव यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.