कोकणावर सातत्याने ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करणारी तरुण आणि खंबीर राजकारणी; आदिती तटकरेंचा राजकीय प्रवास

| Updated on: Aug 06, 2021 | 8:24 AM

नैसर्गिक आपत्तीच्या काळात एक तरुण चेहरा सातत्यानं लोकांसमोर, माध्यमांसमोर येत राहीला. तो चेहरा तरुण असला तरी तेवढाच करारी, ठाम आणि आश्वासक भासत होता. हा चेहरा म्हणजे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे होय.

कोकणावर सातत्याने ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करणारी तरुण आणि खंबीर राजकारणी; आदिती तटकरेंचा राजकीय प्रवास
आदिती तटकरे, पूरग्रस्त भागाची पाहणी
Follow us on

सागर जोशी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : निसर्ग चक्रीवादळ, तौत्के चक्रीवादळ आणि महापूर, तळीये दुर्घटना… अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात एक तरुण चेहरा सातत्यानं लोकांसमोर, माध्यमांसमोर येत राहीला. तो चेहरा तरुण असला तरी तेवढाच करारी, ठाम आणि आश्वासक भासत होता. हा चेहरा म्हणजे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे होय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दोन तरुण चेहरे तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या मंत्रिपदाचा कारभार हाकताना पाहायला मिळतात. त्यात पहिला चेहरा म्हणजे आदित्य ठाकरे आणि दुसरा आदिती तटकरे. (NCP Leader Aditi Tatkare’s political journey)

तटकरे कुटुंबाचं राजकीय वलय आदिती यांच्यामागे आहे, हे त्याही नाकारत नाहीत. सुनील तटकरे यांच्यासारखा मुरलेला राजकारणी त्यांचे वडील आणि राजकीय गुरु आहेत. मात्र, वडिलांचा डोक्यावरील हात काहीसा बाजूला सारून आदिती तटकरे राजकारणात वेगळं स्थान निर्माण करताना दिसून येत आहेत. कोकणासह राज्यातील तरुण वर्गात त्यांची वेगळी क्रेझ निर्माण करण्यात आदिती यशस्वी ठरताना दिसत आहेत.

प्राध्यापक ते राज्यमंत्री

मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर आदिती तटकरे यांनी वेलिंगकर इंस्टीट्यूटमधून एच.आर. मध्ये डिल्पोमा केला. त्यानंतर 2008-09 मध्ये त्यांनी जयहिंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामंही केलं आहे. आणि तेव्हापासूनच त्या रायगड जिल्ह्यातील राजकारण सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं. वडील सुनील तटकरे यांच्या 2009 च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला होता. त्यामुळे 2011 -12 साली पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.

2012 पासून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत आदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये काम सुरु केलं. तेव्हापासून आजपर्यंत त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसमधून काम करत असताना आदिती यांनी 2017 मध्ये वसरे, ता. रोहा या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मार्च 2017 मध्ये त्यांची रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड झाली. अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात खूप चांगल्या प्रकारे काम केल्याचं इथले स्थानिक सांगतात.

पुढे 2019 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं. वडील सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. भाजप-शिवसेना युतीची कडवी टक्कर असतानाही त्या 40 हजाराच्या मताधिक्यानं विजयी झाल्या. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. अखेर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा आदिती यांना मोठी संधी देण्याचा निर्णय झाला आणि त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. आदिती सध्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाचा भार लिलया पेलताना दिसत आहेत. (Aditi Tatkare’s political journey)

तटकरे आडनावाचा किती फायदा झाला किंवा होतो?

वरील प्रश्न जेव्हा त्यांना विचारलं जातं तेव्हा आडनावाचा फायदा आणि नुकसानही होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. कारण. तुम्हाला थेट तुमच्या वडिलांशी जोडलं जातं. माझे आजोबाही राजकारणात होते. वडिलांसारखं होऊ शकते की नाही, त्यांच्यासारखं काम करु शकते की नाही? अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरु असायची. सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आडनावाचा फायदा होईल मात्र, पुढे राजकीय कारकीर्द घडवायची असेल तर तुमचं काम बोलेल, आडनाव नाही, असं स्पष्ट मत आदिती यांनी व्यक्त केलं.

निसर्ग, तौत्केनंतर आता महापूर आणि तळीये दुर्घटना

कोकणावर वर्षभरात तीन मोठ्या आपत्ती ओढावल्या. कोरोना संकटाच्या काळात आधीच कंबरडं मोडलेल्या कोकणातील नागरिकांना निसर्गाने दिलेला हा फटका प्रचंड मोठा आहे. निसर्ग आणि तौत्के चक्रीवादळातून सावरणाऱ्या कोकणवासियांना या महापुरानं मोठा तडाखा दिला. अशावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्या संपर्कमंत्री म्हणून आदिती तटकरे तेवढ्याच हिमतीनं उभ्या असलेल्या दिसल्या. तळीये गावावर डोंगरकडा कोसळून 35 घरं उद्ध्वस्त झाली तर 80 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. दुघर्टनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी यंत्रणेच्या सहाय्यानं आदिती तटकरे तळीये गावात पोहोचल्या. संपूर्ण परिस्थितीची माहिती त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिली. तसंच संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. हे सगळं करत असताना दुसरीकडे त्यांनी तळीयेतील ग्रामस्थांना आणि मृतांच्या नातेवाईकांना धीर देण्याचं कामही केलं.

महाडमध्ये एनडीआरएफचं बेस कॅम्प उभारण्यासाठी प्रयत्नशील

एकीकडे मदतकार्य सुरु असताना दुसरीकडे लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्याचं काम आदिती तटकरे यांनी हाती घेतलं. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य मंत्रिमंडळाशी समन्वय साधण्याचं काम त्यांनी केलं. हे सगळं करत असताना कोकणावर सातत्याने ओढावणाऱ्या या आपत्तींपासून बचाव करण्यासाठी त्यांनी एनडीआरएफचा एक कॅम्प महाडमध्ये उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला. याबाबत बोलताना ‘महाड येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प मंजूर व्हावा यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे तसा प्रस्तावदेखील पाठवला आहे. या बेस कॅम्पसाठी लागणारी 2 हेक्टर पेक्षा जास्त जागा देखील मंजूर करण्यात आली आहे. या बेस कॅम्पमुळे रायगडसह रत्नागिरीमध्येदेखील आपत्तीच्या काळात तात्काळ मदतकार्य पोहचण्यास मदत मिळणार आहे, असं तटकरे यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

महाडमध्येच एनडीआरएफचं बेस कॅम्प का?; आदिती तटकरे यांनी सांगितलं कारण!

पनवेल उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर वाढवण्याचे पालकमंत्री आदिती तटकरेंचे निर्देश

NCP Leader Aditi Tatkare’s political journey