शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार?

| Updated on: Nov 10, 2019 | 9:32 PM

आता शिवसेना (Shivsena on NDA alliance) केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) आणि भाजप बीएमसीतून बाहेर पडणार का याविषयी चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार?
Follow us on

मुंबई: राज्यात सत्तास्थापनेवरुन भाजप-शिवसेनेतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. शिवसेनेने भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर भाजपने राज्यपालांना सत्तास्थापनेसाठी नकार दिला. त्यामुळे आता शिवसेना (Shivsena on NDA alliance) केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडणार का याविषयी चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला राज्यात पाठिंबा देण्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर एनडीएतून (Shivsena on NDA alliance) बाहेर पडण्याची अट ठेवल्याचंही बोललं जात आहे.

भाजप आणि शिवसेना राज्यात भांडत असले तरी केंद्रात दोघेही सोबत आहेत. केंद्रात भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. बहुमतासाठी लोकसभेत 273 खासदारांची गरज असताना भाजपकडे 303 खासदार आहेत. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली तरी केंद्रातील भाजपच्या सत्तेवर त्याचा विशेष परिणाम होणार नाही.

लोकसभेतील संख्याबळ

भाजप – 303
काँग्रेस – 52
डीएमके – 24
वायएसआर काँग्रेस – 22
तृणमुल काँग्रेस – 22
शिवसेना – 18
जेडीयू – 16
बीजेडी – 12
बीएसपी – 10
टीआरएस – 9
लोजप – 6
राष्ट्रवादी काँग्रेस – 5
सपा – 5

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी नाही. मात्र, भाजपला 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याने भाजपने बीएमसीत महापौर पदावर दावा केला नाही. शिवसेनेला बीएमसी महापौर पदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपनं शिवसेनेला मदत केली. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई महापौर पद कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला भाजपने आव्हान दिल्यास इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपने बीएमसीत शिवसेनेच्या महापौर दाव्याला विरोध केल्यास राजकीय उलथापालथ पाहायला मिळेल. त्यावेळी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल. आता भाजप-शिवसेना संघर्ष आणखी वाढवणार की हो दोन्ही पक्ष मध्य काढत पुन्हा एकत्र येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीएमसीतील संख्यागणित –

शिवसेना – 94
भारतीय जनता पार्टी – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी काँग्रेस – 8
समाजवादी पार्टी – 6
एमआयएम – 2
मनसे – 1
अभासे – 1

दरम्यान, चंद्रकात पाटील यांनी सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच चेंडू शिवसेनेकडे टोलवला आहे. जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करायचं असेल, तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा करणार का आणि त्यानंतर शिवसेना सत्तास्थापन करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेनेकडून काय हालचाली होतात हेही पाहावं लागणार आहे.