रामराजे नाईक निंबाळकर यांचं खरं आडनाव माहीत आहे का?; शरद पवार यांनी सांगितला आडनावाचा किस्सा आणि इतिहास

| Updated on: Oct 24, 2022 | 10:08 AM

देशाच्या कानाकोपऱ्यात शिवछत्रपतींचा इतिहास सामान्य माणसाच्या अंतकरणात आहे. राजेरजवाडे अनेक झाले. सामान्यांच्या मनात स्थान असणारे एकच शिवछत्रपती होते.

रामराजे नाईक निंबाळकर यांचं खरं आडनाव माहीत आहे का?; शरद पवार यांनी सांगितला आडनावाचा किस्सा आणि इतिहास
शरद पवार यांनी सांगितला आडनावाचा किस्सा आणि इतिहास
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सातारा: विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल साताऱ्यात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा आढावा घेतानाच त्यांचं भरभरून कौतुक केलं. हे कौतुक करत असतानाच रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचं खरं आडनाव काय याचा किस्सा आणि इतिहासच सांगून टाकला. तसेच आपल्याला नामांतर म्हटल्यावर चिंता वाटते, अशी मिश्किल कोटीही केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

नाईक निंबाळकर यांच खरं आडनाव पवार होतं. इथलं राज्य ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं आडनाव निंबाळकर असं झालं, असा इतिहास सांगतानाच नामांतर म्हटल्यावर मला चिंता वाटते. मुख्यमंत्री असताना एक नामांतराचा निर्णय घेतला होता. मराठवाडा विद्यापीठ, असं शरद पवार म्हणाले.

सामान्यांच्या अंतकरणात श्रीमंत मालोजीराजेंचं नाव आहे. मालोजीराजे यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळानंतर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी यशवंतराव चव्हाण आणि मालोजीराजे यांनी योगदान दिलं. त्यांना पाण्याची नेहमी काळजी असायची. डाव्या आणि उजव्यात कधी भेदभाव केला नाही. मालोजीराजेंनी दूरदृष्टी ठेवल्यामुळे फलटणचा चेहरामोहरा बदलला. त्याच धर्तीवर दुष्काळी भागात पाणी जावं यासाठी रामराजे यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या अनेक प्रकल्पांच्या भूमीपूजनाला मी आलो, असं पवार म्हणाले.

हा छोटेखानी कार्यक्रम आगळावेगळा आहे. माझ्याकडून एक चूक झाली. रामराजेंनी 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर यायचं होतं. त्यांचा अमृतमहोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित करू. रामराजेंच्या जीवनाबद्दल माहिती देणारं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. पण निंबाळकर घराण्याबद्दल काही सांगण्याची आवश्यकता नाही. हे घराणं लोकांच्या मनात आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशाच्या कानाकोपऱ्यात शिवछत्रपतींचा इतिहास सामान्य माणसाच्या अंतकरणात आहे. राजेरजवाडे अनेक झाले. सामान्यांच्या मनात स्थान असणारे एकच शिवछत्रपती होते. इतिहास तपासला तर फलटण आणि शिवछत्रपतींची जवळीक किती अतूट होती हे दिसून येईल, असंही ते म्हणाले.

रामराजेंनी विविध क्षेत्रात आपलं स्थान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. सभागृहात अनेकदा संघर्ष होतो. नियम आणि कार्यपद्धतीला तिलांजली देण्याचं कामही होतं. पण रामराजेंनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं. शांत डोक्याने सभागृह चालवण्याचं रामराजेंचं कसब आहे. त्यांनी उत्कृष्ट सभापती म्हणून कामे केलं. विधीमंडळाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा रामराजेंचं योगदान स्पष्ट केले जाईल. त्यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रम होईल तेव्हा यावे लागेल. शेजारीच आहे, नाही कसं म्हणणार? मला इथल्या लोकांनी निवडून दिलं. ते विसरणार नाही, असं ते म्हणाले.