पुणे : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भाजपमध्ये (BJP) परत जाण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनीच त्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी फोनवर बोलणं झाल्याचा खुलासा केला आणि राज्यात पुन्हा उलटसूलट चर्चांना वेग आला. भाजप आणि राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया ही आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कानावर हात ठेवले तर राष्ट्रवादीने अशी काही गुगली टाकली की, सर्व अचंबित झाले.
आता हाच मुद्या अचानक समोर आल्याने अहमदनगरच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनाही हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांना हा चेंडू पुन्हा एकनाथ खडसे यांच्या कोर्टात टोलावला. या प्रश्नाचे उत्तर नाथाभाऊच देऊ शकतात असा सूर त्यांनी आळवला.
पण पुण्यात आल्यावर बावनकुळे यांनी या प्रश्नांचं पत्रकार परिषदेत उत्तर दिले. एकीकडे उपमुख्यमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्यांनी या प्रकरणी काहीच माहिती नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे काही केल्या नेमकं उत्तर काही गवसत नव्हते.
त्यातच राष्ट्रवादीने तर हा विषय भलतीकडेच वळविला. नाथाभाऊ आणि अमित शहा यांचं बोलणे झाले. नाथाभाऊ आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मिळून अमित शहा यांना भेटायला जाणार असल्याची गुगली त्यांनी टाकली. त्यामुळे नाथाभाऊच्या घरवापसीची हवाच काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला.
आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून, नाथाभाऊंच्या घरवापशीविषयी आपल्याशी चर्चा झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार ही चर्चा निरर्थक असल्याचा दावा ही त्यांनी केला. त्यामुळे आता ही घरवापसी केवळ चर्चाच होती, हे वेगळं सांगायला नकोच..