Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी झालं, मंत्रीपदही मिळतील पण आदर? तो कसा मिळणार? 6 अँगल

| Updated on: Jun 30, 2022 | 10:37 AM

Maharashtra Political Crisis : शिंदे यांना शिवसेनेतील अंतर्गत रोष तर असणार आहेच. पण त्यासोबत त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसशीही येत्या काळात दोन हात करावे लागणार आहेत.

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी झालं, मंत्रीपदही मिळतील पण आदर? तो कसा मिळणार? 6 अँगल
एकनाथ शिंदे, बंडखोर शिवसेना नेते
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उद्धव ठाकरे यांना मुख्ममंत्रिपदावरुन पायउतार (Uddhav Thackeray Resignation) व्हावं लागलं. त्याला प्रमुख कारणं ठरलं, एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड! या बंडाचे महाराष्ट्राच्या राजकारवर (Maharashtra Political Crisis) गंभीर परिणाम झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदेचं बंड (Eknath Shinde Rebel) यशस्वी झालं. आता शिंदे आणि त्यांच्या गटाला मंत्रिपदं मिळतील. खातेवाट होईल. नवं सरकार स्थापलं जाईल. पण स्वतःला अजूनही शिवसैनिक म्हणवणारा हा शिंदे गट आधीसारखारच आदर मिळवू शकेल का? बंडखोरीनंतर शिवसेनेत तो आदर त्यांनी कसा मिळेल? असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रश्नाची सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि शिवसेनेच्या गोटात चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात शिंदेच्या बंडाला यश आलंय. पण त्यांना गमावलेला आदर मिळवण्यात यश येईल का? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी मोहिम हाती घेतल्याचं शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार वारंवार सांगत आहेत. त्यांच्या या शब्दांवर लोकांना खरंच विश्वास वाटतोय का, हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचाय.. जाणून घेऊयात याच संदर्भातील पाच महत्त्वाच्या
बाजू…

01 ठाकरेंचा विश्वास गमावला

आपल्याल लोकांना दगा दिला, घात केला, अशा भावना उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलेल्या आहेत. आपल्यातील लोकांनी केलेल्या दगाबाजीने उद्धव दुखावले गेलेत. या बंडाळीने उद्धव ठाकरेंना एक मोठा धडा दिलाय. बंडखोरांवर आता उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्याची कोणतीही शक्यत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा करतानाही त्यांनी बंडखोरांना समोर येऊन बोलण्याचं आवाहन केलं होतं. पण बंडखोर अखेरपर्यंत समोर आले आहे. आता सरकार पडल्यानं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ‘उद्धवसाहेबांना आम्हाला दुखवायचं नाही’, ‘आम्ही केलेलं बंड हे आमच्या नेत्याविरुद्ध नव्हतं, ते राष्ट्रवादी-काँग्रेस विरुद्ध होतं’ अशी वक्तव्य केली आहेत. या वक्तव्यांतून ठाकरे कुटुंबीयांबाबत त्यांच्या बोलण्यातली आत्मीयता दिसून येते. पण ठाकरेंचा गमावलेला विश्वास ते नेमका कसा पुन्हा मिळवू शकतील, हा मात्र कायम राहतो.

हे सुद्धा वाचा

02 राष्ट्रवादी आणि काँग्रेस

राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सत्ता नको, हीच प्रमुख मागणी बंडखोर आमदारांची होती. त्यांना ही आघाडी अनैसर्गिक भासली होती. अडीच वर्षानंतर अखेर बंडाचा उद्रेक झाला. एकनाथ शिंदे यांनी जवळपास अख्खी शिवसेनाच फोडली. आता शिंदे यांना शिवसेनेतील अंतर्गत रोष तर असणार आहेच. पण त्यासोबत त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसशीही येत्या काळात दोन हात करावे लागणार आहेत. राजकारण कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असं म्हणतात. पण सरकार पाडण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्यांना इतक्या सहज राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वीकारुन पुढे जाईल, अशी शक्यता फारच कमी दिसते.

03 शिवसैनिकांचा रोष

एकनाथ शिंदे गटाला शिवसैनिकांकडून फोन येण्यास सुरुवात झालेली आहेच. फक्त फोन नव्हे, तर मेसेज, सोशल मीडियावर पोस्ट, रस्तोसस्ती पोस्टर, याच्या माध्यमातून शिवसैनिकांनी आपला बंडखोरांप्रती असलेला राग व्यक्त केलाय. हा राग लगेच शांत होण्याची दूरगामी शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनावर झालेली जखम शिंदेगट कशी भरुन काढेल, हाही प्रश्न आहेच.

04 आतून भाजपसोबत केलेली हातमिळवणी

खरंतर महाविकास आघाडी सरकार स्थापलं गेलं, तेव्हापासून हा प्रयोग कितपत टिकेल, असा प्रश्न होता. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून हे सरकार पडावं, यासाठी प्रयत्न केले गेले, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजपला हे सरकार पाडायचं होतं, अशी टीका शिवसेनेच्या नेत्यांनी सातत्यानं केली. अखेर शिवसेनेतील काही आमदारांना ईडीची भीती घालून आणि दबाव टाकून हातमिळवणी भाजपसोबत करण्यास भाग पाडलं गेलं. सत्तास्थापनेसाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्यानं अखेर आतून झालेली बंडखोरीची भाजपसोबतची हातमिळवणी, हे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणतली सगळ्यात मोठी घडामोडी ठरली. आता ही हातमिळवणी केलेल्यांना शिवसेनेत मात्र मोठ्या आव्हानांना तोंड द्यावी लागण्याची दाट शक्यताय.

05 भाजप नेतेही जिथं पवारांचा आदर करतात त्यांच्याबद्दलची भूमिका

बंडखोरांना राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत राहायचं नव्हतं. पण एकावेळी भाजपनेही राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेचा डाव रचलेला होता. हा डाव अयशस्वी झाला असला, तरिही आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष शरद पवारांचा आदर करतात. त्यांच्या वैचारीक वैराशी राजकीय डावपेच जरी खेळले जात असले, तरी पवारांचा आदर हा भाजपच्या नेत्याकडून केला जातो. अशा स्थितीत आता बंडखोरांनी पवारांना ठाकरेंच्या अपयशाला जबाबदार धरलंय. तशी वक्तव्यही केली गेलीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आता नेमकी काय भूमिका बंडखोर भविष्यात घेतात, त्यातून अनेक गोष्टी उलगडत जाणार आहेत.

06 शिंदेंनी बंडासाठी दिलेल्या कारणांना लोकपाठिंबा नाही

एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यामागची चार कारणं दिली होती. उद्धव ठाकरेंनी आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. पण आपल्या चार मागण्या एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या. या चारही मागण्या मान्य होण्यासारख्या नव्हत्या, हे शिंदेंना आधीच माहीत होतं. तर दुसरीकडे या मागण्यांना लोकपाठिंबाही नव्हतं. बंडखोरांकडून देण्यात आलेल्या कारणांवरुन राजकीय गदारोळही झाला. आरोप प्रत्यारोप झाले. पण त्याचा थेट परिणाम मतदारांवर झाला, तर आश्चर्य वाटायला नको.

वरीच पाचही मुद्द्यांचा विचार करता एकनाथ शिंदे यांच्यासाठी येणारा काळ हा राजकीय दृष्ट्या सोपा नसणार, हे नक्की! भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर नेमकं त्यांची रणनिती काय असते? शिवसेनेतील गमावलेला आदर ते पुन्हा मिळवू शकतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Government Formation LIVE Updates : वाचा प्रत्येक घडामोड एका क्लिकवर