औरंगाबादः शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या (Chandrakant Khaire) डोक्यावर परिणाम झालाय. ते काहीही बोलत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये (Gram Panchayat Election) आमच्या गटाला विजय मिळाल्यामुळे ते काहीही आरोप करत सुटलेत, अशी टीका आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलीय. औरंगाबादमध्ये टीव्ही9 शी बोलताना त्यांनी ही टीका केली. वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत संजय शिरसाट यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. मात्र शिरसाट यांनी कमावलेली रसद निवडणुकीत वापरली. मूळ शिवसेनेचे आमदार पळवले, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला. त्याला उत्तर देताना आमदार संजय शिरसाट यांनी टीका केलीय.
चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. निवडणुकीत ज्यांचा विजय होतो, तो नम्रपणे मानला जातो. आमचा पराभव झाला असता तर शिंदे गटाला हादरा, पराभवापासून सुरुवात असं म्हटलं असतं. जे उमेदवार निवडून आलेत, त्यांचं सुरुवातीपासूनचं नेतृत्व मीच करत होतो. वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीसाठीचं मतदान जवळपास 40 हजार आहे. बाकीच्या 3-4 हजार, 2 हजार अशा असतात. हा शहरी भाग आहे. 40 हजारांनी जेव्हा आम्हाला मतदान केलंय तर ते स्वीकारलं पाहिजे. आमचा पराभव झाला असता तर आम्ही तेही स्वीकारलं असतं…असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं.
चंद्रकांत खैरेंसारख्या स्थानिक कार्यकर्त्यांमुळेच उद्धव ठाकरे गटाचा पराभव होतोय, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं. मी कसा निष्ठावंत आहे, हे दाखवण्याचा खैरेंचा प्रयत्न आहे. मात्र त्यांच्यामुळेच ठाकरेंचा इथे पराभव झालाय…असं शिरसाट म्हणाले..
शिंदे गटाला जनता नाकारेल, असं वक्तव्य वारंवार उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येतंय. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ’40 आमदार, 12 खासदार, पदाधिकारी आमच्याकडे असतील. तरीही जे झोपेचं सोंग घेतील तर आम्ही काही करू शकत नाहीत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय म्हणून संजय शिरसाट समजले जात आहेत. मुंबईत झालेल्या अनेक बैठकांनाही ते उपस्थित होते. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, यावर शिरसाट यांनी भाष्य केलंय. आज आणि उद्या राष्ट्रपतींनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. त्यानंतर लगेच म्हणजे सोमवार किंवा मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकेल, अशी शक्यता आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलीय.
चंद्रकांत खैरे यांच्यावर आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही टीका केलीय. खैरेंच्या वागण्याची पद्धत बरोबर नाही. ते कार्यकर्त्यांना बोलताना आरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज असल्याचं वक्तव्य प्रदीप जैस्वाल यांनी केलंय.