महाविकासआघाडीचं पुढील लक्ष्य फडणवीसांचा बालेकिल्ला, स्थानिक समीकरणं काय?

| Updated on: Dec 03, 2019 | 8:33 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या आगळ्यावेगळ्या राजकीय समीकरणांचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर पडले. आता या समीकरणांचा थेट परिणाम राज्यातील स्थानिक राजकारणावरही पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे (Political equations of Nagpur Zilha Parishad).

महाविकासआघाडीचं पुढील लक्ष्य फडणवीसांचा बालेकिल्ला, स्थानिक समीकरणं काय?
Follow us on

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या आगळ्यावेगळ्या राजकीय समीकरणांचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर पडले. आता या समीकरणांचा थेट परिणाम राज्यातील स्थानिक राजकारणावरही पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे (Political equations of Nagpur Zilha Parishad). सध्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये जिल्हापरिषदेच्या निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. हा भाजपचा गड मानला जात असला तरी यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांचा काय परिणाम होणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत (Political equations of Nagpur Zilha Parishad).

मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या नागपुरातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. 7 जानेवारी 2020 रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 जानेवारी रोजी होईल. नागपूर जिल्ह्यात 58 सर्कल आणि 13 पंचायत समित्यांमध्ये ही निवडणूक होईल. आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने मागील अडीच वर्षांपासून नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक रखडली होती. नागपुरातील अध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या महिला सदस्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यापूर्वी नागपूर जिल्हा परिषदेसाठी ‘खुल्या वर्गातील महिला’ ही सोडत निघाली होती.

नागपूर जिल्हापरिषदेवर भाजपचा कब्जा असला तरी यावेळच्या निवडणुकीत चित्र पालटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल अडीच वर्ष उशिराने ही निवडणूक होत आहे. सोबतच राज्यात सत्ता परिवर्तन होऊन आता महाविकासआघाडी सत्तेत आहे. त्यामुळे महाविकासआघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांना याचा चांगलाच फायदा होऊ शकतो, असं मत राजकीय विश्लेषक भूपेंद्र गणवीर यांनी व्यक्त केलं आहे.

नागपूर जिल्हापरिषदेची 2012 मधील पक्षीय बलाबल (एकूण सदस्यसंख्या 58)

भाजप – 21
काँग्रेस – 19
शिवसेना – 8
राष्ट्रवादी काँग्रेस – 7
बीएसपी – 3

नागपूर जिल्ह्यात कोणत्या भागात कुणाचा प्रभाव?

नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी समीकरणं आहेत. जिल्ह्यातील सावनेर परिसरात काँग्रेसचा बोलबाला आहे. तिथं आमदार सुद्धा काँग्रेसचाच आहे. त्याचा फायदा त्या भागात काँग्रेसला होईल. काटोल परिसरात अनिल देशमुख यांच्या रुपाने राष्ट्रवादी आहे, तर उमरेडमध्ये पुन्हा काँग्रेसनं आपला झेंडा रोवला. त्यामुळे तिथं काँग्रेसला फायदा होऊ शकतो. रामटेक शिवसेनेचा गड आहे. त्याठिकाणी जुना शिवसैनिक अपक्ष म्हणून आशिष जयस्वाल निवडून आले. तिथे शिवसेना आहे. दुसरीकडे हिंगणा आणि कामठी भागात भाजप प्रभावी आहे.

एकूणच नागपूरचं चित्र बघितलं तर राज्याप्रमाणे नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील महाविकासआघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढली, तर चित्र बदलण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या हातातील नागपूर जिल्हापरिषद महाविकासआघाडीच्या ताब्यात जाऊ शकते, असं मत राजकीय विश्लेषक भूपेंद्र गणवीर यांनी व्यक्त केलं आहे.

नागपूर जिल्हापरिषद ही महत्वाची जिल्हापरिषद आहे. विशेष म्हणजे भाजपसाठी ही जिल्हापरिषद प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी या जिल्हापरिषदेवर विजय मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील, असंच दिसत आहे. असं असलं तरी नागपूर ग्रामीण भागातील जनता आता कुणाला कौल देते यावर बरिच गणितं ठरणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची पसंती कुणाला हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.