‘..नाहीतर जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो!’, कराडांच्या जन-आशीर्वाद यात्रेत दानवेंची टोलेबाजी

| Updated on: Aug 20, 2021 | 12:10 AM

जालन्यात रात्री पार पडलेल्या सभेत रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास शैलीत खुमासदार भाषण केलं. मला जालन्यात राहून कोलकाता, मुंबई दिसते. कारण मी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभा आहे. 35 वर्षे मला जालना जिल्ह्यातील मतदारांनी खासदार केलं म्हणून आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झालो. हे झालं नसतं तर आज जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो, अशी मिश्किल टिप्पणी दानवे यांनी केली.

..नाहीतर जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो!, कराडांच्या जन-आशीर्वाद यात्रेत दानवेंची टोलेबाजी
रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
Follow us on

जालना : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज जालन्यात पोहोचली. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही उपस्थित होते. जालन्यात रात्री पार पडलेल्या सभेत रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास शैलीत खुमासदार भाषण केलं. मला जालन्यात राहून कोलकाता, मुंबई दिसते. कारण मी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभा आहे. 35 वर्षे मला जालना जिल्ह्यातील मतदारांनी खासदार केलं म्हणून आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झालो. हे झालं नसतं तर आज जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो, अशी मिश्किल टिप्पणी दानवे यांनी केली. दानवे यांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्येही चांगलाच हशा पिकला. (Raosaheb Danve criticizes CM Uddhav Thackeray and the Mahavikas Aghadi government)

मतदारांच्या हातात आमच्या पतंगाचा दोरा आहे. आज भागवत कराड यांची मांडव परतनी झाली. पण माझा हनिमून झाला, असंही दानवे यांनी म्हटलं. मात्र, भागवत कराड हे पहिल्या वेळेस मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आल्यानं मांडव परतनी हा शब्द वापरल्याचं दानवे म्हणाले. माझे मंत्रीपद जाणार म्हणून काही जणांना आनंद तर काही जणांना गुदगुल्या झाल्या होत्या, असा टोलाही दानवे यांनी आपल्या विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री घरात बसून म्हणतात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’

पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिक आणि महिलांसाठी विविध योजना आणल्या. 1980 ला मी 5 हजार रुपयात गॅस विकत घेतला होता. पण आज मोदींमुळे 100 रुपयांत गॅस कनेक्शन मिळत आहे. मोदींनी शेतकऱ्यांना युरियाच्या बॅगमागे 1 हजार 250 रुपये सबसिडी दिली. राज्यात मात्र अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे. आम्ही रस्त्यावर उतरुन कोरोना काळात काम केलं. पण मुख्यमंत्री घरात बसून म्हणतात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, असा जोरदार टोलाही दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

भागवत कराडांकडून पंतप्रधान मोदींचे आभार

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवाद संपवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची पत मोदींनी वाढवली. नरेंद्र मोदी यांनी देशात गोर-गरीब लोकांसाठी योजना काढल्या. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना काढली. महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना मोदींनी आणली. मोदी सरकारच्या काळात कलम 370 रद्द केलं. मोदींच्या काळात अयोध्येत राम मंदिराचं भूमिपुजन पार पडलं, अशी मोदींच्या कामांची यादीच भागवत कराड यांनी वाचून दाखवली. मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं मराठवाड्याचा विकास होईल, अशी ग्वाही यावेळी कराड यांनी आपल्या भाषणात दिली आहे.

संबंधित बातम्या : 

शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण, आता नारायण राणेंकडून जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले राणे?

हमीभावासाठी भारतीय किसान संघ आक्रमक, देशात 515 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये करणार आंदोलन

Raosaheb Danve criticizes CM Uddhav Thackeray and the Mahavikas Aghadi government