Ratnagiri Shiv sena : कोकणातून उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका! नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

| Updated on: Jul 18, 2022 | 8:26 AM

आता कोकणातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना एक मोठा दणका बसलाय. कारण नव्या नियुक्त पदाधिकाऱ्यांनी अगदी काही तासातच आपले राजीनामे टाकले आहेत. त्यामुळे हा पेच आणखी वाढतोय.

Ratnagiri Shiv sena : कोकणातून उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका! नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
कोकणातून उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका! नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांचं बंड (Cm Eknath Shinde) झाल्यापासून उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) डोकेदुखी सुरू झाली आहे ती अजूनही संपत नाहीये. उद्धव ठाकरे यांच्यासमोर तसेच एकनाथ शिंदे यांच्या समोरचा कायदेशीर पेच एकीकडे कोर्टात (Supreme Court) सुरू आहे. तर दुसरीकडे ग्राउंड लेव्हलची राजकीय समीकरणे ही रोज बदलू लागली आहेत. उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा रोज कमी होत चालला आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद रोज वाढत चाललेली आहे. रोज शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाची वाट धरताना दिसत आहेत. आता कोकणातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना एक मोठा दणका बसलाय. कारण नव्या नियुक्त पदाधिकाऱ्यांनी अगदी काही तासातच आपले राजीनामे टाकले आहेत. त्यामुळे हा पेच आणखी वाढतोय.

काही तासात पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला बसलेला हा झटका यावेळेस आता रत्नागिरीतून बसला आहे. जिल्हाप्रमुखांनी आपला पदभार स्वीकारण्यास थेट नकार दिला आहे. तसेच कौटुंबिक आणि आरोग्याचे कारण देत प्रकाश रसाळ यांनी हात झटकले आहेत. रत्नागिरी तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनी ही काही तासातच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच उदय सामंक समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत, यात उपजिल्हाप्रमुख यांना हटवण्यात आलं होतं. आता नवीन नियुक्ती झाल्यानंतर काही तासात शिवसेनेत राजीनाम्यांची लाईन लागल्यामुळे, तसेच या नाराजी नाट्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

प्रयत्न करूनही गळती थांबेना

एकनाथ शिंदे यांचं बंड होऊन सरकार पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोज मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. तसेच आदित्य ठाकरे हेही निष्ठा यात्रा व इतर दौऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आपल्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच शिवसेनेचे इतर नेतेही ठीक ठिकाणी कार्यक्रम घेत, सभा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मात्र हा संवाद साधायला उशीर झालाय का? असाही सवाल या नाराजीने उपस्थित होत आहे. अनेक जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांना समर्थन हे वाढत चाललेलं आहे. तसेच काही बडे नेतेही एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ठाकरेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता उद्धव ठाकरे आणखी काही वेगळा निर्णय घेणार का? हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.