मुंबई : ‘मिस्टर फडणवीस नुसती कटकारस्थानं करुन हे राज्य चालणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन राज्य चालवावं लागणार आहे. ती क्षमता केवळ शिवसेनेच्या नेतृत्वात आहे’, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) या कार्यक्रमाला उपस्थित होते. सोमवारी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे राज्यसभे प्रमाणेच या निवडणुकीतही मोठी रंगत पाहायला मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार (Shivsena MLA) आणि नेत्यांच्या उपस्थित मुंबईत एका हॉटेलमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
काही लोक आज जे टिरटिर आणि पिरपिर करत आहेत ते भविष्यात शिवसेनेच्या पायाशी असतील. आम्ही ईडी-सीबीआयला घाबरत नाही. अंगावर आलात तर शिंगावर नाही तर पायाखाली तुडवले जाल इतकंच मी सांगतोत. शिवसेना ही अग्नी आहे. या अग्नीत समिधा टाकण्याचं काम खालो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करत असतात. अयोध्येला गेलो तेव्हा तिथले शिवसैनिक स्वागतासाठी सज्ज होते. बाळासाहेबांचे नातू येत आहेत, हिंदुत्वाचा भगवा ज्यांनी डौलानं फडकवत ठेवला आहे. त्यांचे नातू वारस येत आहेत म्हणल्यावर तिथे स्वागतासाठी लखनऊपासून अयोध्यापर्यंत सगळे उभे होते, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागला, ठीक आहे एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेची घालमेल सुरु आहे. मी इतकंच सांगतो एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं नाही, महाराष्ट्र जिंकला असं नाही. या राज्याचं सूत्र शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. फार घमेंड करु नका. अगदी स्पष्ट सांगायचं तेरा घमंड तो चार दिन का है पगले… हमारी बादशाही तो खानदानी है. ती राहणार आणि ती दिसेल. या बादशाहीला नख लावण्याची हिंमत अजून कुणाची नाही.