सिंधुदुर्ग: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना आपल्याला अटक होणार असल्याची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी वर्षभर तुरुंगात राहण्याची मानसिकता तयारी केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी केला आहे. संजय राऊत मला आठ दिवसांपूर्वी भेटले होते. वर्षभर मी नसेल माझं जे काम आहे. त्यात तुम्हाला मदत करावी लागेल. शिवसेना वाढवावी लागेल, त्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. वर्षभरानंतर मी पुन्हा येईल, असं राऊत म्हणाले होते. त्यांनी ती मानसिक तयारीच केली होती. म्हणूनच ते तडफेने भाजपवर बोलत आहेत, भाजपच्या (bjp) चुकीच्या धोरणांवर बोलत होते. त्यावरून आपल्याला अटक होणार हे त्यांना माहीत होतं, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
गेले वर्ष दीड वर्ष ईडीकडून राऊतांना सातत्याने चौकशीला बोलावलं जात होतं. ते चौकशीला गेले. पण चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्नच विचारला नाही. उलट त्यांना सांगितलं तुम्हाला अटक करायची आहे, हे वरूनच आदेश आहेत, असा गौप्यस्फोट करतानाच काहीही झालं तरी आम्ही राऊतांच्या पाठी ठामपणे उभे आहोत, असं वैभव नाईक यांनी सांगितलं.
भाजपकडून देशभरात विरोधकांच्या मागे चौकशा लावून त्यांना अटक करत आहे. जेलमध्ये या किंवा भाजपमध्ये जा, असं धोरणच भाजपने अवलंबलं आहे. सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या चौकशा सुरू झाल्या. त्या थांबण्यासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत. मात्र संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीने छापेमारी केली. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेली ही छापेमारी अजूनही सुरूच आहे. राऊत आणि त्यांच्या त्यांच्या पत्नीची ही चौकशी करण्यात येत आहे. तसेच राऊत यांच्या भांडूप येथील बंगल्यावर छापेमारी सुरू असतानाच दादरमधील फ्लॅटवरही छापा मारण्यात आला आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.