मुंबई : (Eknath Shinde) शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटप झाल्यानंतर आता 17 ऑगस्टपासून (Monsoon Session) पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. अधिवेशनात राज्यातील जनतेच्या विविध समस्या घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हा विरोधकांचा असतो. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर हे पहिलेच अधिवेशन होत असताना आणि सरकारला कोंडीत पकडण्याची संधी असतानाही आदित्य ठाकरे मात्र, पक्ष संघटनेच्या नियोजित कार्यक्रमात असणार आहेत.
शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यापासून पक्षाचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी सबंध ठाकरे कुटुंब हे राबत आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्यांच्यावर हल्लाबोल तर करीत आहेतच पण थेट जनतेशी संवाद साधत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी हे बंडखोर आमदार गद्दार असल्याचाही उल्लेख केली आहे. त्यावरुनही राजकारण चांगलेच पेटले होते. आता 17 ऑगस्ट रोजी शिवसंवाद यात्रा ही रायगडात येणार आहे. या यात्रेतच आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेतील आमदारांनी बंडाची भूमिका घेतल्याने शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार, खासदार आणि नंतर पदाधिकारी हे शिंदे गटातस सहभागी झाले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात शिवसंवाद अशी यात्रा सुरु केली आहे. यापूर्वी कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा हे विभाग पूर्ण झाल्यानंतर आता 17 ऑगस्ट रोजी ठाकरे हे रायगड जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत. शिवाय दुसरीकडे पावसाळी आधिवेशन सुरु होत असताना देखील त्यांनी ह्या यात्रेला खंड दिलेला नाही.
बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून आमदारांनी ही भूमिका घेतलेली आहे. याला सर्वसामान्य जनता कधीही माफ करणार नाही असे म्हणत पक्षाची धोरणे आणि विचार पोहचवण्याचे काम आदित्य ठाकरे हे करीत आहेत. शिवाय हे आमदार गद्दार नसून महा गद्दार असल्याचा उल्लेखही त्यांनी अनेकवेळा केला आहे.