मुंबई: मायदेशात झालेल्या पहिल्या T20 सामन्यात काल ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. 208 एवढी मोठी धावसंख्या उभारुनही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हा पराभव जिव्हारी लागणं स्वाभाविक आहे. अशा पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतय. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वास्तविक चिंतेचा विषय
“पुढच्या महिन्यात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी भुवनेश्वर कुमारची डेथ ओव्हरमधील गोलंदाजी वास्तविक चिंतेचा विषय आहे” असं गावस्कर म्हणाले.
डेथ ओव्हर्समध्ये बऱ्याच धावा दिल्या
भुवनेश्वरने मागच्या काही सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये बऱ्याच धावा दिल्या आहेत. काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सामन्यात 19 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरने 16 रन्स दिल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला.
दव होता, असं मला वाटत नाही
“विकेटवर भरपूर दव होता, असं मला वाटत नाही. आपले फिल्डर्स आणि बॉलर्स टॉवेलचा वापर करताना दिसले नाहीत. दव कारण असू शकत नाही. आपण चांगली गोलंदाजी केली नाही. उदहारण म्हणून 19 वी ओव्हर घेऊया. हा वास्तविक चिंतेचा विषय असू शकतो” असं गावस्कर म्हणाले.
हा चिंतेचा विषय
“भुवनेश्वर कुमारकडे चेंडू सोपवल्यानंतर तो प्रत्येकवेळी धावा देतोय. पाकिस्तान, श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 व्या षटकात गोलंदाजी करताना त्याने 49 धावा दिल्या. प्रतिचेंडू त्याने 3 धावा दिल्या आहेत. त्याचा अनुभव आणि क्षमता लक्षात घेता, तो 18 चेंडूत 35-36 धावा देईल अशी अपेक्षा असते. वास्तवात हा चिंतेचा विषय आहे” असं गावस्कर म्हणाले.
बुमराहच्या पुनरागमनाने बळकटी मिळेल
टीम इंडियाने चांगली धावसंख्या उभारली. पण त्यांना पराभव टाळता आला नाही. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाने टीमला आणखी बळकटी मिळेल अशी अपेक्षा गावस्करांनी व्यक्त केली. जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्ध शेवटची वनडे मालिका खेळला होता. पाठिच्या दुखापतीमुळे तो तेव्हापासून बाहेर आहे.