नवी दिल्ली : बीसीसीआयनं पुढच्या महिन्यात म्हणजेच 18 ऑक्टोबरला एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलंय. याचवेळी महिला आयपीएलबाबतही मोठ्या घोषणेची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता बीसीसीआय (BCCI) लवकरच निवडणूक घेणार होणार आहे. सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि जय शाह (Jay shah) यांच्यासह सध्याच्या पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणार की नाही हे, हे या निवडणुका ठरवतील. 18 ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलंय. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि निवडणुका होतील.
बीसीसीआनं सचिव जय शाह यांनी सर्व राज्य संघटनांना पत्र पाठवलंय. यात 18 ऑक्टोबरला होणारी एजीएम आणि त्यात कोणते मुद्दे मांडले जातील याची माहिती देण्यात आलीय.
बीसीसीआयची 91 वी एजीएम असणार आहे. शेवटची वार्षिक बैठक डिसेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती. अजेंडा महिला IPL वरील अपडेट्सपासून ते ICC मध्ये BCCI प्रतिनिधी निवडण्यापर्यंतचा आहे. सर्वात जास्त लक्ष वेधणारा विषय म्हणजे बोर्ड अधिकाऱ्यांची निवड.
सध्याचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, खजिनदार अरुण धुमाळ या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला आहे. सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच बीसीसीआयच्या घटनेत बदल करण्यास परवानगी दिल्यानंतर आणखी एका कार्यकाळासाठीचा मार्ग मोकळा झालाय.
सध्याचे मंडळ अधिकारी जवळपास स्पष्ट झाले आहेत. पण, बहुतेकांच्या नजरा अध्यक्षपदावर आहेत. गांगुली पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार की जय शाह त्यासाठी दावा सांगणार? अलीकडील अहवालांमध्ये असा दावा करण्यात आलाय की, बहुतेक राज्य संघटना जय शाह यांना बोर्ड अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारू इच्छितात आणि त्यांना विश्वास आहे की त्यांच्यासाठी बोर्डाची जबाबदारी घेण्याची हीच योग्य वेळ आहे.