तुमचा फोन किती वेळ खणखणून बंद होतो? टेलिकॉम कंपन्यांना कोट्यवधींचा फरक पडतो!

| Updated on: Sep 25, 2019 | 2:10 PM

जिओ वगळता सर्वच भारतीय टेलिकॉम कंपन्यांना रिंगर ड्युरेशन 30 सेकंद असावा, असं वाटतं. जिओला मात्र तो 25 सेकंद ठेवण्याची इच्छा आहे. तसं केल्यास स्पेक्ट्रम कार्यक्षमता वाढते, असा दावा जिओने केला आहे.

तुमचा फोन किती वेळ खणखणून बंद होतो? टेलिकॉम कंपन्यांना कोट्यवधींचा फरक पडतो!
Follow us on

मुंबई : ‘रिलायन्स जिओ’ आणि ‘भारती एअरटेल’ या दोन टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या अनोखं युद्ध रंगलं आहे. ही चढाओढ डेटा स्पीड किंवा कॉल रेट्सवरुन नाही, तर रिंगर टाईमवरुन (Airtel Jio Call Ringing Time). आता तुम्ही म्हणाल, की यामुळे काय फरक पडतो. पण तुमचा फोन किती वेळ खणखणून बंद होतो, यामुळे टेलिकॉम कंपन्यांना कोट्यवधींचा फरक पडतो.

‘रिलायन्स जिओ’वरुन इतर कुठल्याही नेटवर्कधारकांना केल्या जाणाऱ्या फोनचा रिंगिंग ड्युरेशन कमी केल्याची तक्रार ‘एअरटेल’ने टेलिकॉम रेग्युलेटर ‘ट्राय’कडे केली आहे. उदाहरणार्थ ‘जिओ’वरुन इतर, समजा ‘एअरटेल’ सिमधारकाला फोन करायचा असेल, तर त्याचा फोन खणखणण्याचा कालावधी ‘जिओ’ने 20 सेकंदांपर्यंत आणल्याची तक्रार (Airtel Jio Call Ringing Time) ‘एअरटेल’ने केली आहे. म्हणजे जिओ टू जिओ रिंगर टाईम 30 सेकंद, पण जिओ टू अदर्स रिंगर टाईम फक्त 20 सेकंद.

‘जिओ’वरुन आलेला कॉल उचलायला जाईपर्यंत कट होत असल्याचं ‘एअरटेल’चं म्हणणं आहे. जिओच्या एकतर्फी कारभारामुळे आपल्या ग्राहकांची गैरसोय होत असल्याचा दावा ‘एअरटेल’ने केला आहे.

Airtel चा नवा प्लान, दररोज 2GB डेटासोबतच 4 लाखांचा जीवन विमा

जिओ वगळता सर्वच भारतीय टेलिकॉम कंपन्यांना रिंगर ड्युरेशन 30 सेकंद असावा, असं वाटतं. जिओला मात्र तो 25 सेकंद ठेवण्याची इच्छा आहे. तसं केल्यास स्पेक्ट्रम कार्यक्षमता वाढते, असा दावा जिओने केला आहे. जिओने ही वेळ आता 25 वरुन 20 सेकंदांवर आणली आहे. त्यामुळे इतरांवरही रिंगर टाईम कमी करण्याची सक्ती होत आहे. पर्यायाने कॉल फॉरवर्ड आणि कॉल अनाऊन्समेंटसारखे फीचर्स निरुपयोगी ठरतात, असं एअरटेलने ‘ट्राय’ला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

आता प्रश्न पडतो, कॉल लवकर कट होत असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याची खरंच काळजी एअरटेलला वाटते का? तर यामागे खरी गोम वेगळीच आहे. प्रत्येक टेलिकॉम ऑपरेटरला दुसऱ्या नेटवर्कवर कॉल केल्यास इंटरकनेक्ट यूसेज चार्ज (interconnect usage charge – IUC) द्यावा लागतो. म्हणजेच ‘एअरटेल’ धारकाने ‘जिओ’ला कॉल केला, तर ‘एअरटेल’ला त्याचे पैसे ‘जिओ’ला द्यावे लागतात.

जिओची ‘आयडिया’?

एअरटेलच्या दाव्याप्रमाणे रिंगर ड्युरेशन कमी असल्यास फोन लवकर कट होणार. म्हणजे जिओ धारकाने एअरटेलवाल्या मित्राला केलेला कॉल घेईपर्यंत कट झाला. त्यामुळे जिओचे द्यावे लागणारे पैसे वाचले. आता, एअरटेलवाला मित्र जिओवाल्या मित्राला कॉलबॅक करणार. त्यामुळे जिओचे पैसे तर वाचलेच, शिवाय एअरटेलकडून आयते पैसे मिळाले, ही खरी मेख.

जिओने आपले दर कमी केल्यापासून ‘इंटरकनेक्ट यूसेज चार्ज’ हा त्यांच्या इतर टेलिकॉम कंपन्यांसोबतच्या वादात कळीचा मुद्दा ठरत आहे. सुरुवातीला जिओ मार्केटमध्ये नवीन असल्यामुळे बहुसंख्य कॉल्स हे इतर नेटवर्कला करावे लागत होते. परंतु सप्टेंबर 2017 मध्ये ट्रायने ‘इंटरकनेक्ट यूसेज चार्ज’ 57 टक्क्यांनी कमी केले. म्हणजेच प्रति मिनट 14 पैशांवरुन हा दर सहा पैशांवर आणण्यात आला. एअरटेल आणि वोडाफोन यांचा कस्टमर बेस मोठा असल्यामुळे त्यांना सर्वाधिक फटका बसला.

आयडिया आणि वोडाफोनने हातमिळवणी करत सर्वात मोठं नेटवर्क होण्याचा मान पटकावला. तर जिओने एअरटेलवर कुरघोडी केली. मात्र या कंपन्यांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांच्यावर मिळून 2 ट्रिलियन अर्थात दोन लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळे साहजिकच ‘इंटरकनेक्ट यूसेज चार्ज’सारख्या छोट्या गोष्टीनेही मोठा फरक पडतो.