एका वर्षात बुडाले 20 हजार कोटी; भारतात इंटरनेट एक तास बंद राहिल्यास किती आर्थिक नुकसान?

| Updated on: Sep 27, 2021 | 11:04 AM

Internet Shutdown | इंटरनेट बंद पाहता उदयपूरच्या व्यापाऱ्यांच्या संघटनेने हे पाऊल मागे घेण्याची विनंती केली होती. नेटबंदीमुळे व्यवसायाचे मोठे नुकसान होईल असे म्हटले होते. व्यापारी संघटनेने राजस्थान उच्च न्यायालयाचा हवाला देत म्हटले आहे की, इंटरनेट बंद करणे न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आहे. स्पर्धा परीक्षांच्या दरम्यान इंटरनेट सेवा बंद करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते.

एका वर्षात बुडाले 20 हजार कोटी; भारतात इंटरनेट एक तास बंद राहिल्यास किती आर्थिक नुकसान?
इंटरनेट
Follow us on

नवी दिल्ली: राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी इंटरनेट सेवा खंडित झाली होती. शिक्षक पात्रता चाचणी अर्थात REET परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी आणि लोकांना ऑनलाइन फसवणूक करण्यापासून रोखण्यासाठी, इंटरनेट बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. REET च्या परीक्षेत कॉपी होण्याचा धोका होता. त्यामुळे राजस्थान सरकारने सीकर, दौसा, अलवर आणि जयपूर ग्रामीण परिसरात इंटरनेट बंदीचा फतवा काढला होता. मात्र, यामुळे व्यापारी आणि स्थानिक लोकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.

इंटरनेट बंद पाहता उदयपूरच्या व्यापाऱ्यांच्या संघटनेने हे पाऊल मागे घेण्याची विनंती केली होती. नेटबंदीमुळे व्यवसायाचे मोठे नुकसान होईल असे म्हटले होते. व्यापारी संघटनेने राजस्थान उच्च न्यायालयाचा हवाला देत म्हटले आहे की, इंटरनेट बंद करणे न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आहे. स्पर्धा परीक्षांच्या दरम्यान इंटरनेट सेवा बंद करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते.

इंटरनेट अत्यावश्यक सेवा

इंटरनेट सेवा अत्यावश्यक सेवांच्या यादीत समाविष्ट आहे. अनेक व्यवसाय आणि व्यवसायाशी संबंधित गोष्टी इंटरनेटवर आधारित असतात. परीक्षांच्या इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे बँका सर्वाधिक प्रभावित होतात आणि व्यवसाय व्यवहार थांबतात. ज्यामुळे व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागते.

इंटरनेट बंदीत भारत टॉप देशांच्या यादीत

एका अहवालानुसार, भारत हा जगातील सर्वाधिक इंटरनेट बंद असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. पहिल्या चार देशांमध्ये भारत, बेलारूस, येमेन आणि म्यानमार यांचा समावेश आहे. 2020 मध्ये भारतात 8927 तास इंटरनेट बंद होते. ज्यामुळे भारताला सुमारे 20 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले. यापैकी काहीवेळा कायदा-सुव्यवस्थेच्यादृष्टीने इंटरनेट बंद करण्याची वेळ आली होती. पण राजस्थानमध्ये परीक्षांमधील कॉपीचा प्रकार रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेटच बंद करण्याचा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.

इंटरनेटवर बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या गृह सचिवांकडून दिला जातो. हा आदेश मोबाईल कंपन्यांना SP किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वतीने पाठवला जातो. या आदेशावर, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे पुनरावलोकन पॅनेल प्रथम पुनरावलोकन करते. सरकारचे मुख्य सचिव, कायदा सचिव आणि इतर सचिव या बैठकीला उपस्थित राहू शकतात. त्यांच्या पुनरावलोकनाच्या आधारे, इंटरनेटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जातो.

इंटरनेट एक तास बंद राहिल्यास किती नुकसान?

बँकांव्यतिरिक्त, इंटरनेट बंदीमुळे सर्वात मोठे नुकसान ई-कॉमर्सशी संबंधित व्यवसायाचे होते. सध्या चीन हे जगातील सर्वात मोठे ई-कॉमर्स मार्केट आहे. 2022 पर्यंत भारत ही ई-कॉमर्सची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकते. सध्या, जर संपूर्ण जगात एक तास इंटरनेट बंद केले तर हजारो कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. एका आकडेवारीनुसार, जेथे 1 तास इंटरनेट बंद झाल्यामुळे चीनचे 1279 कोटींचे नुकसान होऊ शकते. तर भारताला 450 कोटींचे हे नुकसान सहन करावे लागू शकते. अमेरिकेला हा तोटा 394 कोटी रुपयांचा असू शकतो. 2019 मध्ये इंटरनेट बंद झाल्यामुळे भारताला 1.3 अब्ज डॉलर म्हणजेच 9297 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अशाप्रकारे, इंटरनेट बंद झाल्यामुळे ज्या देशांना त्रास झाला त्यामध्ये भारत तिसरा सर्वात मोठा देश आहे.

संबंधित बातम्या:

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, फोटो व्हिडीओ एकदाच पाहता येतोय, नंतर गायब, सायबर क्राईमचा धोका वाढला!

PHOTO | गूगल आणत आहे आश्चर्यकारक वैशिष्ट्य, आता सर्व अँड्रॉईड वापरकर्ते फोनचे फोल्डर लॉक करू शकणार

64MP कॅमेरासह Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन महिना अखेरीस लाँच होणार, जाणून घ्या काय असेल खास?