बीड : अतिवृष्टी गारपीट यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. यात जे उरलेलं पीक होतं ते बाजारपेठेत विकण्यास गेल्यावर त्याला हमीभाव देखील नाही. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने गारपीटीतून वाचलेला कांदा सोलापूर मार्केटमध्ये जवळपास दोन टनहून अधिक कांदा नेला. मात्र, हमाली आणि प्रवासी खर्चही निघाला नाही. पदरातून व्यापाऱ्यालाच ९८६ रुपये द्यावे लागले. शेतकरी यापुढे जगणार की मरणार मायबाप सरकार याचे उत्तर द्या, असा सवाल अशोक शिंगारे या शेतकऱ्यांने केला आहे. अशोक शिंगारे यांनी दीड एकरवर कांद्याची लागवड केली होती. यांच्या कांद्याला सोलापूरच्या मार्केटमध्ये प्रति किलो एक रुपया, दीड रुपया तर 50 पैसे असा दर मिळाला.