नांदेड: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी राज्यसभेची निवडणूक (rajyasabha election) अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी छत्रपती यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. तर, शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंब्यासाठी पक्षात प्रवेश करण्याची अट घातली आहे. संभाजी छत्रपती यांनी मात्र आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ठेवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. संभाजीराजेंच्या उमेदवारीचं भिजत घोंगड असतानाच अपक्ष निवडणूक लढली तरच पाठिंबा देऊ असं भाजपने म्हटलं आहे. त्यामुळे संभाजीराजे यांची चोहेबाजूंनी कोंडी झालेली असतानाच रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी विनाकारण हरण्यासाठी निवडणूक लढवू नका, असं आवाहन संभाजीराजेंना केलं आहे. त्यामुळे आता संभाजीराजे या निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.