अवकाळीची अवकृपा फळबागांवर, वातावरणातील बदलामुळे शेतकरी मेटाकूटीला

| Updated on: Dec 01, 2021 | 5:11 PM

आता फळबागांवर अवकाळीची अवकृपा सुरु झाली असून राज्यात बुधवारपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. 2 डिसेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता पण नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी सुरु झाल्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम हा शेती व्यवसयावर होत आहे.

अवकाळीची अवकृपा फळबागांवर, वातावरणातील बदलामुळे शेतकरी मेटाकूटीला
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नाशिक : यंदाच्या खरीप हंगामात सुरु झालेली संकटाची मालिका ही आता रब्बी हंगाम निम्म्यावर आला तरी सुरुच आहे. यामध्ये संपूर्ण हंगामाचेच नुकसान झाले आहे. आता फळबागांवर (Untimely rains) अवकाळीची अवकृपा सुरु झाली असून राज्यात बुधवारपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. 2 डिसेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता पण नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी सुरु झाल्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम हा शेती व्यवसयावर होत आहे. कोणत्याच पिकासाठी हा पाऊस आणि वातावरण पोषक राहणार नाही त्यामुळे हा नुकसानीचा शेतकऱ्यांना अधिकचाच अडचणीचा ठरत आहे.

यंदा सर्वच हंगामातील पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पाहवयास मिळालेला आहे. दर पंधरा दिवसांनी वातावरणात होणारा बदल शेती व्यवसायासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. कारण शेतकऱ्यांचे परिश्रम तर निष्फळ ठरत आहेतच पण अधिकचा पैसा खर्ची करुन उत्पादन पदरी पडत नाही ही मोठी शोकांतिका आहे. आता फळबागासह, रब्बी हंगामातील पिके आणि कांद्यावरही किडीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेती करावी कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

कांदा पिकावर किडीचा प्रादुर्भाव

नाशिक जिल्ह्यात हंगामी पिक म्हणून कांदा लागवडीवर भर दिला जातो. शिवाय बाजारपेठही जवळच असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, वातावरणात होत असलेल्या बदलाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. कारण खरिपातील कांद्याचे नुकसान हे पावसामुळे झाले होते तर आता अवकाळीमुळे रब्बी हंगामातील कांद्यावर मावा , करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बुधवारी सकाळी लासलगाव, निफाड, नैताळे, विंचूर या भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता त्याच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना अधिकचा पैसा खर्ची करावा लागणार आहे.

आंबा, काजू फळबागांवरही अवकाळीचा परिणाम

प्रत्येक हंगामातील पिके ही अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळेच खरीप पाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आहे. आता कुठे पिकांची उगवण झाली असताना ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिक उगवताच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्याचा वाढीवर आणि भविष्यात उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे शतकऱ्यांना महागडी औषधे घेऊन फवारणी करावी लागत आहेत तर दुसरीकडे कोकणात आंबा, काजूला मोहर लागला असून त्याची गळती सुरु झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा किडनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

असे करा व्यवस्थापन

वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ रब्बी हंगामातील पिकांवरच नाही तर फळबागा आणि खरिपातील तूर, कापसावरही होत आहे. आंब्याला आता मोहर लागला आहे. यावर बुरशी वाढत असल्याने त्याचे नियंत्रण करणे गरजेचे झाले आहे. द्राक्षामध्ये मनीगळ सुरु झाली आहे. तर मर रोगाचाही प्रादुर्भाव वाढत आहे. थंडी आणि दमट वातावरणामुळे हरभरा, ज्वारी, फळबागामध्ये द्राक्ष यावर दावणी रोग हा वाढत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर आंबा, द्राक्ष या फळबागांवर देखील किटकनाशक आणि रोगनाशक हे एकत्रित मिसळून फवारणी केली तरच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनच शेतकऱ्यांना तारणार, तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण

खरीप-रब्बी नंतर आता अवकाळीचा फळबागांनाही फटका, देवगड हापूसच्या उत्पादनात निम्म्याने घट

दुष्काळात तेरावा : सोयाबीनचे दर घसरताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत