Sugarcane : ऊसाचे क्षेत्र वाढूनही मोबदला मिळेना, काय आहेत फडातल्या अडचणी?

| Updated on: Feb 15, 2022 | 2:30 PM

गेल्या दोन वर्षापासून सरारीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मराठवाड्यातील डोंगराळ भागातही ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. सर्वात मोठे नगदी पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते. शिवाय निसर्गाच्या लहरीपणातून केवळ या पिकाचाच बचाव झालेला आहे. नैसर्गिक संकटावर मात केली मात्र, तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Sugarcane : ऊसाचे क्षेत्र वाढूनही मोबदला मिळेना, काय आहेत फडातल्या अडचणी?
ऊसाला 1 वर्ष पूर्ण होऊनही तोडणीअभावी ऊस हा फडातच आहे.
Follow us on

उस्मानाबाद : गेल्या दोन वर्षापासून सरारीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मराठवाड्यातील डोंगराळ भागातही ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते. शिवाय निसर्गाच्या लहरीपणातून केवळ या पिकाचाच बचाव झालेला आहे. नैसर्गिक संकटावर मात केली मात्र, तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता (Production Increase) उत्पादन वाढूनही काय अडचणी असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल मात्र, ऊसाचा सर्वसाधरण 12 महिन्याचा कालावधी संपूनही अनेक भागातील ऊस फडातच आहे. केवळ बिगर सभासदच नाही तर जे शेतकरी (Sugar Factory) कारखान्याचे सभासद आहेत त्यांचीही हीच अवस्था आहे. कारखान्यांकडून तोडणीचे आश्वासन दिले जात असले तरी कालावधी संपून गेल्याने उत्पादन घट होणार हे निश्चित आहे तर दुसरीकडे जे शेतकरी सभासदच नाहीत त्यांना तर यंदा ऊसाचे गाळप होते की नाही याची धास्ती आहे. त्यामुळे ज्या उत्पादनावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या त्याबाबतही संभ्रम निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप झाल्याशिवाय गाळप हंगाम बंद होणार नाही या साखर आयुक्तांच्या आश्वासनावरच शेतकरी तरलेला आहे.

वाढते क्षेत्रच ठरले अडचणीचे

ऊस म्हणलं की समोर येतो तो पश्चिम महाराष्ट्र. पण आता काळाच्या ओघात मराठवाडा आणि विदर्भातही ऊसाचे क्षेत्र हे वाढलेले आहे. पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांनी केलेली पाण्याची सोय यामुळे वाढीव उत्पन्नाच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर ऊसाची लागवड झालेली आहे. मात्र, कारखान्यांची संख्या तीच आहे. शिवाय यंदा कारखान्यांनी आपले उद्दीष्ट साधलेले आहे. त्यामुळे अतिरिक्त ऊसाबाबत कारखाने देखील गंभीर नाहीत. फडातच ऊसाला तुरे आले आहेत. म्हणजेच त्याचा कालावधी होऊन गेला आहे. आता तोड झाली तरी उत्पादनात घट ही निश्चित मानली जाते.

अगोदर सभासदांना प्राधान्य

यंदा उत्पादनाच्या आशेने जे शेतकरी साखर कारखान्याचे सभासद नाहीत त्यांनीही ऊस लागवडीवर भर दिला होता. मात्र, तोडणी होताना साखर कारखान्यांकडून सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसालाच प्राधान्य दिले जाते. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, जालना जिल्ह्यांमध्ये अजून सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्याच ऊसाची तोड झालेली नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात 12 हजार 500 हेक्टरावर लागवड झाली होती. पैकी 5 हजार हेक्टरावरील ऊस अजूनही फडातच आहे. त्यामुळे क्षेत्र वाढूनही पदरी उत्पन्न पडते की नाही याबाबत शंका आहे.

साखर आयुक्तांचे काय आहेत आदेश?

15 ऑक्टोंबरपासून राज्यात ऊसाचे गाळपाला सुरवात झाली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अजून दोन महिने तरी ऊसाचे गाळप सुरु राहणार आहे. मात्र, कारखाना क्षेत्रातील ऊसाचे गाळप करणे ही जबाबदारी ही संबंधित साखर कारखान्याची आहे. त्यामुळे गाळप पूर्ण केल्याशिवाय कारखाना बंद करता येणार नसल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. या साखर आयुक्तांच्या आश्वासनावरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे भवितव्य अवलंबून आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market: शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ, सोयाबीन दर स्थिरावले, आता घ्या निर्णय..!

Rabi Season : कडधान्य उत्पादन वाढीसाठी ‘त्रिसुत्री’ कार्यक्रम, शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचा काय सल्ला?

Rabi Season : पीक पध्दतीमध्ये बदल, ज्वारीचे क्षेत्र घटले, शेतकऱ्यांनी कोणते पीक निवडले..!