Pik Vima : पावसाने खरिपाचे नुकसान अन् आता भरपाई न मिळाल्याने तक्रारींचा पाऊस, काय होणार पीक विम्याचे?

| Updated on: Dec 18, 2021 | 1:14 PM

खरीप हंगामातील पिके जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे वेळेत विमा रक्कम मिळेल असा आशावाद होतो. एवढेच नाही विमा कंपन्यांनी दिवाळीतच नुकसानभरपाई देण्याच्या सुचना राज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्या होत्या. वेळेच्या नियमांचे सोडा आता भरपाईची रक्कम मिळते का नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Pik Vima : पावसाने खरिपाचे नुकसान अन् आता भरपाई न मिळाल्याने तक्रारींचा पाऊस, काय होणार पीक विम्याचे?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : (Kharif Season) खरीप हंगामातील पिके जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे वेळेत (Crop Insurance Amount) विमा रक्कम मिळेल असा आशावाद होतो. एवढेच नाही विमा कंपन्यांनी दिवाळीतच नुकसानभरपाई देण्याच्या सुचना राज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्या होत्या. वेळेच्या नियमांचे सोडा आता भरपाईची रक्कम मिळते का नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण गतआठवड्यात विमा कंपन्यांनी नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरवात केली आहे. मात्र, आता सहा दिवसानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कमच जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाऊस कृषी कार्यालयात सुरु झाला आहे. दिवस उजाडताच शेतकरी तक्रार घेऊन तालुका कृषी कार्यालयात पोहचत आहेत. सर्वाधिक तक्रारी उस्मानाबाद जिल्ह्यातून दाखल झाल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारी अर्जाचे भवितव्य काय?

शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरापासून राज्य स्तरीय समिती नेमली जाते. तालुकास्तरीय समितीचे अध्य़क्ष हे तहसीलदार तर जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. यामध्ये कृषी अधिकारी, विमा प्रतिनीधी, दुय्यम निबंधक, शेतकरी प्रतिनीधी यांचा समावेश असतो. शेतकऱ्यांच्या तक्रारी एकत्र करुन त्यावर काय तोडगा निघू शकतो याचा अभ्यास ही समिती करते. यामध्ये चूक कोणाची आहे ? विमा काढताना नेमके काय झाले होते. त्यानुसार तालुका समिती निर्णय देते. यामध्ये शेतकरी किंवा विमा कंपनी ही जर असमाधानी असेल तर मग जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समिती यामध्ये हस्तक्षेप करते. यामध्येही पर्याय निघाला नाही तर मात्र, कोर्टात न्याय मागण्याचा अधिकार विमा कंपनीला आणि शेतकऱ्यांनाही आहे.

ही तर शेतकऱ्यांची फसवणूकच

पीक नुकसानीनंतर 72 तासाच्या आतमध्ये नुकसानीचे फोटो माहिती ही शेतकऱ्यांना ऑनलाईन करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी ही प्रक्रियाही पूर्ण केली मात्र, ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पीक विमा नुकसानीचा पंचनामा करण्यास महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनीधी असताना देखील प्रत्यक्षात नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांना मिळालेलीच नाही. आता पाच दिवस उलटूनही रक्कम खात्यावर जमा होत नसल्याने शेतकऱ्यांनी तक्रारीचे अर्ज करण्यास सुरवात केली आहे. सर्वाधिक अर्ज हे उस्मानाबाद जिल्ह्यातून दाखल झाले आहेत.

क्षुल्लक गोष्टीमुळे शेतकऱ्यांना त्रास

पीक पाहणी आणि पंचनाम्या दरम्यान, नुकसानभरपाईचे आश्वासन हे विमा कंपनीच्या प्रतिनीधींकडूनही देण्यात आले होते. मात्र, भरपाईमध्ये गटानिहाय बदल आहे. त्यामुळे एकाच गटातील शेतकऱ्याला भरपाई रक्कम मिळाली आहे तर दुसऱ्या त्याच गटातील शेतकरी हा या रकमेपासून दूर राहिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे. यापूर्वीही उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला होता. मात्र, तक्रारदार शेतकऱ्यांची संख्या ही वाढतच आहे. आता तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

संबंधित बातम्या :

ऊसाला कांदा भारी, कशामुळे होतोय पश्चिम महाराष्ट्रात पीक पध्दतीमध्ये बदल?

Rabi Season : काय सांगता ? रब्बीत काळ्या गव्हाचा पेरा, शेतकऱ्याच्या नव्या प्रयोगाचे कृषी विभागालाही कुतूहल

शेतकऱ्यांनो केवळ तक्रारी करा, थकीत ‘एफआरपी’ तो ही व्याजासकट पदरात पडेल