सोयाबीनची वाटचाल पुन्हा चढ्या दराकडे, केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय

| Updated on: Dec 08, 2021 | 3:04 PM

पुन्हा सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. गत आठवड्यात 6 हजार 200 गेलेले दर आता 6 हजार 500 वर स्थिरावलेले आहेत. शिवाय केंद्र सरकारनेही आता सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरात अणखीन वाढ होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची साठवणूक अजूनही शेतकऱ्यांच्या फायद्याचीच ठरणार आहे.

सोयाबीनची वाटचाल पुन्हा चढ्या दराकडे, केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कमालीचा चढ-उतार झालेला आहे. त्यामुळे सोयाबीन दराचे भवितव्य काय असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत होता. पण पुन्हा सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. गत आठवड्यात 6 हजार 200 गेलेले दर आता 6 हजार 500 वर स्थिरावलेले आहेत. शिवाय केंद्र सरकारनेही आता सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरात अणखीन वाढ होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची साठवणूक अजूनही शेतकऱ्यांच्या फायद्याचीच ठरणार आहे. दर स्थिर असले तरी मात्र, बुधवारी सोयाबीनची आवक ही 15 हजार पोत्यांवर गेली होती. दिवाळीनंतर आजच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झाली होती.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा साठवणूक

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आता सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पोल्ट्रीफार्मधारक हे सोयाबीनचे दर नियंत्रणात रहावे म्हणून सोयापेंडची आयात करण्याची मागणी करीत होते. मात्र, या मागणीला राज्यातील शेतकरी, शेतकरी संघटना तसेच राजकीय नेत्यांचाही विरोध होता. याच दरम्यान, शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोयापेंडची आयात केली तर शेतकऱ्यांची काय अडचण होणार हे पटवून सांगितले. त्यामुळे 5 लाख 50 हजार टन सोयापेंडची आयात होणार नसल्याचे गोयल यांनी स्पष्ट केल्याने आता सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नविन तुरही बाजारात दाखल

खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेली तुरही आता लातूरच्या बाजार समितीमध्ये दाखल होत आहे. नव्या पिंक तुरीला 5 हजार तर पांढऱ्या तुरीला 6 हजार 200 चा दर मिळाला आहे. मात्र, यंदा तूर आणि हरभऱ्याची आवक केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे सध्याचा तुरीचा दर हा हमीभावापेक्षा कमी आहे. त्यामुळे तुरीची आवक वाढली तर भविष्यात दरही कमी होतील. त्यामुळे त्वरीत हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी आता शेतकरी करु लागले आहेत. हमीभाव केंद्रावर तुरीचा दर हा 6 हजार 300 रुपये ठरविण्यात आला आहे. त्यामुळे यंदा हमीभाव केंद्राची गरज भासणार आहे. उडदाचे दर पुन्हा वाढले असून आता 7 हजार 500 रुपये क्विंटलचा दर सुरु आहे.

घटलेल्या दराचा परिणाम सोयाबीनच्या आवकवर

गतआठवड्यात सोयाबीनच्या दरात कमालीची घट झाली होती. 6 हजार 600 वरील सोयाबीन थेट 6 हजारावर येऊन ठेपले होते. एवढेच नाही तर दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे. त्यामुळे अणखीन दर घटतील या धास्तीने शेतरकऱ्यांनी सोयाबीन विक्रीवर भर दिला होता. त्यामुळेच बुधवारी 15 हजार पोत्यांची आवक झाली होती. आता सोयापेंडची आयात होणार नाही म्हणल्यावर त्याचाही काय परिणाम होतो हे पहावे लागणार आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6400 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6200 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4850, सोयाबीन 7276, चमकी मूग 7350, मिल मूग 6450 तर उडीदाचा दर 7500, पांढरी तूर 6050 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

थंडी सुरु होताच मुंबईकरांचा अंड्यावर ताव, मागणी वाढल्याने दरही वधारले

तुतीची लागवड अन् रेशीमचे उत्पादन, उद्योग सुरु करण्यासाठी जाणून घ्या महत्वाची माहिती..

अगोदर लसीकरणाचे प्रमाणपत्र, मगच शेतीमाल बाजारात, कोणत्या बाजार समितीने काढले ‘फर्मान’?