Rabi Season : सकाळी थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका, पिकांसाठी पोषक की हानिकारक..! काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

| Updated on: Feb 16, 2022 | 4:02 PM

आर्द्रतेचा आभाव व निरभ्र आकाशामुळे कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होतो का हे देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

Rabi Season : सकाळी थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका, पिकांसाठी पोषक की हानिकारक..! काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील मोहरीचे पीक बहरत आहेत.
Follow us on

लातूर : (Climate Change) वातारणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा पिकांवर होतो. सध्या आर्द्रता कमी झाल्याने कोरडे हवामान असून स्वच्छ व निरभ्र आकाश आहे. सकाळी थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका अशी आवस्था झाली आहे. आर्द्रतेचा आभाव व निरभ्र आकाशामुळे कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांवर होतो का हे देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात तर आहेतच पण फलधारणेच्या अवस्थेत असल्याने या वातावरणाचा परिणाम झाला तर थेट उत्पादनच घटणार आहे. मात्र, सध्याचे वातावरण पिकांच्या वाढीस आणि फलधारणेसाठी पोषक असल्याचे मत (Advice from agricultural experts) कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे केवळ रस शोषणाऱ्या अळीचा बंदोबस्त केल्यास उत्पादनात वाढ होणार आहे.

थंडी कमी, तापमानाचा पिकांना फायदा

रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडी ही पोषक मानली जाते. पण आता पिकांची वाढ तर झाली असून हंगामातील सर्वच पिके शेंगा लागण्याच्या आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सध्या 17 ते 18 अंश सेल्सिअस तापमानात शेंगा पोसण्यासाठी तसेच ज्वारी पिकामध्ये दाणे भरण्यासाठी वातावरण चांगले आहे. पिकांना माल लागण्याच्या दृष्टीने सध्याचे वातावरण हे सर्वोत्तम आहे. यामुळे उत्पादनात देखील वाढ होणार असल्याचा विश्वास रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केला आहे.

रस शोषण किडीचा धोका

रब्बी हंगामातील पिके बहरत असतानाच रस शोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे या अळीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. या दरम्यान, मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे हे पिकांमधील रस शोषण करतात. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. एकीकडे पिकांची वाढ जोमात होत असतानाच दुसरीकडे या रस शोषण किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी फवारणी केली तर उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. रस शोषण अळीची पाहणी केल्याशिवाय त्यावर काय फवारावे हे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सहायकाचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे चांडक यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता? महावितरणच देणार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, एकाच मोर्चात अनेक प्रश्न मार्गी..!

कृषी पंपासाठी चार तासच वीज पुरवठा, खरिपात निसर्गाचा लहरीपणा अन् रब्बीत महावितरणचा मनमानी कारभार

12 वर्षाची तपश्चर्या आली कामी, संशोधन केंद्राच्या नव्हे तर शेतकऱ्याच्या वाणाला मिळाली मंजुरी..!