लम्पीरोग गाई म्हशींवर, त्यामुळे दुधाबाबतची ही अफवा समजून घ्या

| Updated on: Sep 11, 2022 | 10:04 PM

लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

लम्पीरोग गाई म्हशींवर, त्यामुळे दुधाबाबतची ही अफवा समजून घ्या
लम्पी स्कीन
Follow us on

मुंबई : (Lumpy Skin) लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाने देशात धुमाकूळ घातला आहे. जनावरांमध्ये हा रोग अधिक जलद गतीने फैलावत आहे. महाराष्ट्रात लम्पी स्कीन हा नियंत्रणात असला तरी राजस्थान, मध्यप्रदेश, गुजारत, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाला घेऊन काही (Rumour) अफवाही पसरत आहेत. राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत आहे. परिणामी शहरी भागातील (Milk supply) दूध पुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासूनही माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

गायी आणि म्हशीमध्येच प्रादुर्भाव

लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दूध उकळून पिल्यावर कोणताही धोका राहणार नाही.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासूनही काही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात लम्पी स्कीनचा धोका कमी आहे. सर्वाधिक नुकसान हे राजस्थानातील शेतकऱ्यांचे झाले आहे. महाराष्ट्रातील नगर, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, पुणे या जिल्ह्यामध्ये फैलाव झाला आहे. तर राज्यातील 850 जनावरांना लम्पीरोग झाला होता त्यापैकी 590 जनावरे ही बरी झाली आहेत.

राजस्थानात 75 हजार जनावरे दगावली

लम्पीचा सर्वाधिक धोका हा राजस्थानात निर्माण झाला आहे. या राज्यात 75 हजार गायी-म्हशी ह्या दगावल्या आहेत. राजस्थान पाठोपाठ गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मिर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे.