नंदुरबार : शेतीत काही राम नाही असं म्हणत शेती सोडून दुसऱ्या व्यावसायाकडे वळणारे अनेक जण आपण पाहत असतो. शेती हा तोट्याचा व्यावसाय असा अनेकांचा समज आहे. शेतकऱ्यांची सध्याची स्थिती बिकट असल्याने शेतीबद्दल अनेकांचा नकारात्मक दृष्टीकोन हा स्वाभाविकही आहे, मात्र आधुनिक शेती आणि मागणी व पुरवठ्याचा अभ्यास केल्यास शेती व्यावसायातूनही (Farmer Success Story) लाखोंचे उत्पन्न कमावल्या जावू शकते. नंदुरबार तालुक्यातील कोठली गावातील एका इंजिनियर तरूणाने हे सिद्ध करून दाखवले आहे. अभियांत्रिकीचं शिक्षणाचं घेऊन शेतीची कास धरत हा तरूण चक्क लाखो रूपयांचे उत्पन्न कमावतोय. कोण आहे हा तरूण आणि काय आहे त्याची शेतीची पद्धत जाणून घेऊया.
नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील सागर शांतीलाल पाटील यांनी ज्ञान आणि अभ्यासातून आपल्या शेतीत सुधारणा घडवल्या. दुष्काळाचे आव्हान जाणून सिंचन व्यवस्था बळकट केली बाजारपेठेतील मागणी ओळखून निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेत मिरची, पपई, केळी अशा प्रमुख पिकात मास्तरी संपादन केली. या पिकांसोबत शेतीचे उत्तम नियोजन केले त्यातून शेतीतील अडथळे, समस्या दूर करून अधिक नफ्याची शेती करणे त्यांना शक्य झाले. 12 एकर क्षेत्रात केळी 3 एकर, कारली 3 एकर, पपई 3 एकर आणि मिरची तीन एकर क्षेत्रावर लागवड केली पाण्याचे उत्तम नियोजन करत आधुनिक पद्धतीने शेती करून यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न ते घेत आहे.
सागर पाटील यांनी इंजिनिअरिंगची पदवी सोबतच बीएससी ऍग्री ही पदवी देखील धारण केली आहे. बीएससी ऍग्रीसारखी मोठी पदवी हाती असतानासुद्धा कोणत्याही प्रकारची नोकरी न करता शेती करून कशाप्रकारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावता येईल याचे उत्तम उदाहरण सागर पाटीलच्या रूपाने आज पाहायला मिळत आहे.