पीक विमा योजनेचा परतावा मिळेना, नंदुरबारमध्ये 1037 शेतकऱ्यांना लाभ, शासनानं मध्यस्थी करण्याची मागणी

| Updated on: Jul 08, 2021 | 5:36 PM

देशभरातील शेतकरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत नुकसान भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार थोडी आहे.

पीक विमा योजनेचा परतावा मिळेना, नंदुरबारमध्ये 1037 शेतकऱ्यांना लाभ, शासनानं मध्यस्थी करण्याची मागणी
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

नंदुरबार: शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. देशभरातील शेतकरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत नुकसान भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार थोडी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील केवळ 1037 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. गेल्या 7 वर्षात इतक्या कमी संख्येने शेतकऱ्यांना मदत मिळाल्यानं अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. (Nandurbar farmers facing problems in crop insurance scheme)

2020 मध्येही खरिप हंगामात शेतकऱ्यांचं नुकसान

नंदुरबार जिल्ह्यातील गेल्या खरीप हंगामात विमा घेणाऱ्या दहा हजार शेतकऱ्यांना भरपाई विनाच राहावं लागलं असल्याचे समोर आलं आहे. 2020 च्या खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे पिकाची कापणी करताना समोर आलं होतं. जिल्ह्यात केवळ 1,037 शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळाला आहे.

नंदुरबारमध्ये तीन लाख हेक्टरवर पिकांची पेरणी

जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी तीन लाख हेक्टर वर खरीप पिकांची पेरणी होते. कोरड आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रात पीकपेरा होतो. गेल्या दशकभरात हवामान बदलाचा परिणाम झाल्याने कोरडा आणि ओला दुष्काळ अशा दोन्ही संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना अमलांत आणली होती.

विमा योजना लागू करण्यात आल्यानंतर सात वर्षे संपूर्ण नुकसान होऊनही केवळ दोन वेळेस पूर्ण क्षमतेने नुकसान भरपाई मिळाली आहे. 2020-21 मध्ये जिल्ह्यातील 10,641 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र, फक्त 1,037 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. उर्वरित 9,604 शेतकरी अजूनही पिक विमा पासून वंचित आहेत.

केंद्र सरकारने ही योजना शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा लूट करण्यासाठी आणलीय का असा सवाल अनेक शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज देणाऱ्या बँक विमा योजना ऐच्छिक असतानाही शेतकऱ्यांना विमा करण्यास सक्ती करतात. परंतु, भरपाई देताना मात्र संबंधित कंपनीकडून भरपाईस देताना विलंब होत आहे, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. पीक विमा परतावा मिळत नाही या गोष्टीकडे शासनाने काहीतरी मध्यस्थी करून मार्ग काढावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या:

उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले

यवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई

(Nandurbar farmers facing problems in crop insurance scheme)