Pomegranate Garden: डाळिंबाच्या संरक्षणासाठी मालेगावच्या शेतकऱ्याची नामी शक्कल, पंचक्रोशीत चर्चा

| Updated on: Apr 27, 2022 | 9:29 AM

सध्या उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासह फळपिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. डाळिंबाचा हंगाम संपला असून छाटणी कामे पूर्ण झाली आहेत. अशा अवस्थेत पाणी पुरवठा वेळेत झाला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. पण सध्याच्या वाढत्या उन्हामुळे बागा सुकू लागल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळी ही झपाट्याने खलावत आहे.

Pomegranate Garden: डाळिंबाच्या संरक्षणासाठी मालेगावच्या शेतकऱ्याची नामी शक्कल, पंचक्रोशीत चर्चा
उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी डाळिंब बागेलाच साड्यांचे सुरक्षा कवच केले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मालेगाव: अवकाळी पाऊस आणि वातारणातील बदलामुळे (Pomegranate Garden) डाळिंब बागांचे नुकसान झालेच आहे. शिवाय यावर कोणताच पर्याय शेतकऱ्यांना काढता आला नाही. आता वाढत्या (Temperature) उन्हामुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. किमान आगामी उत्पादनावर याचा परिणाम होऊ नये म्हणून (Malegaon) मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील शेतकऱ्याने असे काय जुगाड लावले आहे की पंचक्रोशीत त्याची चर्चा होऊ लागली आहे. डाळिंब उत्पादक सुरेश निकम यांनी 1 एकरातील तब्बल 300  डाळिंबाच्या झाडांना साड्यांचे अच्छादन केले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून वाढलेल्या उन्हामुळे ही वेळ डाळिंब उत्पादकांवर आली आहे. शिवाय पाणी पातळीतही घसरण झाल्याने बागा जोपासणे जिकिरीचे झाले आहे.

शेतकऱ्याचे 5 हजारात जुगाड

वाढत्या उष्णतेचा पिकांना मोठा फटका बसत आहे. डाळींब पिक धोक्यात आले आहे.मात्र, डाळींबाचे आगार समजल्या जाणाऱ्या मालेगाव दाभाडी येथील डाळींब उत्पादक सुरेश निकम यांनी नामी शक्कल लढवित चक्क डाळींब पिकांना साड्यांचे अच्छादन केले.स्थानिक बाजारपेठेतून त्यांनी 15 ते 20 रुपयांना जुन्या साडया विकत घेतल्या. एक एकरातील 300 झाडांना त्यांनी साड्यांचे अच्छादन केले.त्यासाठी त्यांना अवघा 5 हजार रुपये खर्च आला.कमी खर्चात त्यांच्या डाळींब बागाचे उन्हापासून संरक्षण होणार आहे.

वाढत्या उन्हाचा धोका काय?

सध्या उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासह फळपिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. डाळिंबाचा हंगाम संपला असून छाटणी कामे पूर्ण झाली आहेत. अशा अवस्थेत पाणी पुरवठा वेळेत झाला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. पण सध्याच्या वाढत्या उन्हामुळे बागा सुकू लागल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळी ही झपाट्याने खलावत आहे. त्यामुळे संरक्षणासाठी निकम यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

अनोख्या शक्कलचा इतर शेतकऱ्यांनाही फायदा

कमी क्षेत्रात फळबागांचे उत्पादन घेतले तर त्याचे नियोजन करता येते हे निकम यांच्या या प्रयोगातून समोर आले आहे. शिवाय हे कमी क्षेत्र असल्यानेच शक्य झाल्याचे निकम यांनी सांगितले आहे. आता त्यांच्या या कल्पनेचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही होत आहे. डाळिंब बागांचे संरक्षण करण्यासाठी इतर शेतकरीही हाच पर्याय निवडत आहेत. कमी खर्चात किमान मे महिन्यातील उन्हाच्या झळापासून संरक्षण होईल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.