इंधन विक्री कोविडपूर्व पातळीवर, भारत पेट्रोलियमचा निव्वळ नफा 8,788.73 कोटींवर

| Updated on: May 27, 2022 | 10:56 AM

इंधन विक्री जवळपास कोविडपूर्व पातळीवर पोहोचली असून, पेट्रोल,डिझेलच्या विक्रीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात भारत पेट्रोलियमचा निव्वळ नफा 8,788.73 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

इंधन विक्री कोविडपूर्व पातळीवर, भारत पेट्रोलियमचा निव्वळ नफा 8,788.73 कोटींवर
Follow us on

नवी दिल्ली : भारतामधील दुसरी सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी (Oil marketing company) असलेल्या भारत पेट्रोलियमच्या (Bharat Petroleum) निव्वळ नफ्यात चालू वर्षात वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2020 – 23 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा (Net profit) 8,788.73 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही कंपनीच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. तसेच इंधन विक्रीमध्ये देखील वाढ झाली असून, इंधन विक्री कोवीडपूर्व काळाच्या पातळीवर पोहोचल्याचे देखील कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होती. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या मागणीत देखील मोठी घट झाली होती. मात्र आता कोरोना निर्बंध उठवल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनाच्या मागणीत वाढ झाली असून, मागणी जवळपास कोरोना पूर्व काळाच्या पातळीवर पोहोचल्याचे बीपीसीएलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

बीपीसीएलच्या खासगीकरणाला ब्रेक

बीपीसीएलमध्ये 52.98 टक्के इतकी सरकारची भागीदारी आहे. निर्गुंतवणूक धोरणांतर्गत सरकारने बीपीसीएलमधील आपली सर्व भागिदारी विकण्याचा निर्णय घेतला होता. त्या दृष्टीने काही पाऊले देखील टाकण्यात आली होती. मात्र ज्या संस्थांनी बीपीसीएल खरेदीमध्ये रुची दाखवली होती. त्या संस्था ऐनवेळेस मागे हटल्याने सध्या बीपीसीएलच्या खासगीकरणाला ब्रेक लागला आहे. भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणासाठी केंद्र सरकारच्या वतीने मार्च 2020 मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या संस्थांना इंटरेस्ट लेटर सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही कंपनी खरेदी करण्यासाठी तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. मात्र सध्या या सर्व प्रक्रियेला ब्रेक लागला असून, आता सरकार ही कंपनी विकण्यासाठी नवी योजना बनवत असल्याची माहिती पीटीआयकडून मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

म्हणून घेतली माघार

भारत पेट्रोलियमच्या खरेदीसाठी तीन जणांनी बोली लावली होती. मात्र आता यातील दोन कंपन्यांनी माघार घेतली आहे. गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाचा मोठा फटका हा कंपन्यांना बसला आहे. तर दुसरीकडे सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे व्यवसायाची अनेक समिकरणे बदलली आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या कंपन्यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरं आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या बाजारात इंधनाच्या भावात मोठी चढ-उतार पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये कंपन्या जोखमी घेणे टाळत आहेत.