Naina Sahni Tandoor Murder | विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हत्या, नैना साहनीच्या शरीराचे तुकडे तंदूरमध्ये जाळले

| Updated on: Aug 19, 2021 | 7:34 AM

सुशील शर्माला पत्नी नैना साहनी आणि मतलूब करीम यांच्या मैत्रीवर आक्षेप घेतला. मतलूब आणि नैना हे वर्गमित्र होते, तसेच ते काँग्रेसमधील सहकारी कार्यकर्तेही होते. मात्र नैनाचे मतलूबशी विवाहबाह्य संबंध असल्याचा सुशीलला संशय होता. त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Naina Sahni Tandoor Murder | विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हत्या, नैना साहनीच्या शरीराचे तुकडे तंदूरमध्ये जाळले
पती सुशील शर्मा आणि नैना साहनी (उजवीकडे)
Follow us on

मुंबई : दिल्लीतील नैना साहनी तंदूर मर्डर केस हा 1995 मध्ये अत्यंत गाजलेला खून खटला. 29 वर्षीय काँग्रेस कार्यकर्ती नैना साहनी (Naina Sahni) हिची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरीराचे लहान-लहान तुकडे करुन तंदूरमध्ये जाळण्यात आले होते. नैनाचा पती आणि युवा काँग्रेस नेता, माजी आमदार सुशील शर्माने (Sushil Sharma) विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून 2 जुलै 1995 रोजी आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप झाला होता. सुशील शर्माला हत्या प्रकरणात ट्रायल कोर्ट, दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले होते. मात्र 8 डिसेंबर 2020 रोजी उच्च न्यायालयाने शर्मा दोषी नसल्याचे नमूद केले.

सुशील शर्माला पत्नी नैना साहनी आणि मतलूब करीम (Matloob Karim) यांच्या मैत्रीवर आक्षेप घेतला. मतलूब आणि नैना हे वर्गमित्र होते, तसेच ते काँग्रेसमधील सहकारी कार्यकर्तेही होते. मात्र नैनाचे मतलूबशी विवाहबाह्य संबंध असल्याचा सुशीलला संशय होता. त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.

नेमकं काय घडलं होतं?

2 जुलै 1995 च्या रात्री सुशील शर्मा आपल्या घरी आला. तेव्हा त्याने नैनाला फोनवर बोलत दारुचे सेवन करताना पाहिले. सुशीलला बघताच नैना चपापली आणि तिने फोन ठेवून दिला. बायकोने पटकन फोन केल्याचं पाहून सुशीलच्या मनातील संशयाचा किडा वळवळू लागला. पलिकडे कोण होतं, हे शोधण्यासाठी सुशीलने फोन रिडायल केला. तेव्हा मतलूबचा आवाज ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नैनाचे मतलूबशी विवाहबाह्य संबंध असल्याची सुशीलला खात्रीच झाली. रागाच्या भरात आपल्या रिव्हॉल्वरमधून तीन गोळ्या त्याने नैनावर झाडल्या. त्यापैकी एक तिच्या डोक्याला, एक मानेला, तर तिसरी रुममधील एसीला लागली. मात्र नैना यात जागीच गतप्राण झाली.

हॉटेलच्या तंदूरमध्ये मृतदेह भाजला

हत्येनंतर रात्री दीड वाजता सुशील नैनाचा मृतदेह बगिया नावाच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. रेस्टॉरंटचा मॅनेजर केशवकुमार त्याच्या ओळखीचा होता. त्याच्या मदतीने सुशीलने नैनाच्या डेड बॉडीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाचे लहान तुकडे केल्यानंतर ते जाळण्यासाठी तंदूर (मातीची भट्टी) मध्ये ठेवण्यात आले होते. मृतदेह जळत नसल्याचं पाहून बटरचा वापर करण्यात आला. तंदूरमधून येणाऱ्या धूर, उग्र आणि घाणेरड्या वासामुळे जवळच्या एका महिलेचं लक्ष गेलं आणि तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी केशवकुमारला अटक केली, पण सुशील पळून जाण्यात यशस्वी झाला होता. अखेर आठवड्याभराने म्हणजेच 10 जुलै 1995 रोजी त्याने आत्मसमर्पण केले. या प्रकरणात नैनाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी डीएनए पुराव्यांचा वापर देखील करण्यात आला होता.

नैनाचे दोनदा शवविच्छेदन

पहिले पोस्टमॉर्टम एलएचएमसी, दिल्ली येथे करण्यात आले. त्यानुसार, नैनाच्या मृत्यूचे कारण भाजल्यामुळे झालेल्या जखमा असल्याचे मानले गेले. तर दुसरे शवविच्छेदन दिल्लीच्या उपराज्यपालांच्या आदेशानुसार करण्यात आले होते. टी डी डोगरा यांच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांच्या चमूने ते केले होते. त्यांना डोके आणि मानेच्या भागात दोन गोळ्या सापडल्या, बंदुकीच्या जखमांमुळे नैनाचा मृत्यू झाल्याचे कारण अहवालात सांगितले गेले. त्यामुळे तपासाचा मार्ग बदलला आणि वास्तव समोर आले. हे प्रकरण दुसऱ्या शवविच्छेदनाच्या उपयुक्तेबाबत एक महत्त्वाचा दाखला मानले जाते.

फाशीची शिक्षा

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि 27 जुलै 1995 रोजी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 7 नोव्हेंबर 2003 रोजी सुशील शर्माला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर रेस्टॉरंटचा व्यवस्थापक केशवकुमार याला सात वर्षांची सक्तमजुरी देण्यात आली.

सुशील शर्माने जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले. दिल्ली उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांचा निर्णय कायम ठेवला. 2003 मध्ये न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली, जी नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने 2007 मध्ये कायम ठेवली. 2013 मध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने शर्माने आपल्या पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा “कोणताही पुरावा” नसल्याचे सांगत त्याची फाशीची शिक्षा बदलली.

सुशील शर्माला तत्काळ सोडण्याचे आदेश

8 ऑक्टोबर 2013 रोजी मुख्य न्यायाधीश पी. सथाशिवम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने शर्माची शिक्षा कायम ठेवली. मात्र न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली कारण शर्माला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसेच, हा समाजाविरुद्धचा गुन्हा नसून आरोपीने त्याच्या पत्नीशी असलेल्या तणावपूर्ण वैयक्तिक संबंधांमुळे केलेला गुन्हा आहे. 1 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सुशील शर्माला तत्काळ सोडण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या :

Sandhya Singh | जतीन-ललितच्या बहिणीची झालेली हत्या, मुलानेच मृतदेह अ‍ॅसिडमध्ये विरघळवल्याचा होता संशय

पत्नीचा हनीट्रॅप प्रमाणे वापर, मुंबईतील दोन धनदांडग्यांच्या हत्या, सिमरन सूद-विजय पालांडे कसे लागले होते पोलिसांच्या हाती?