दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : देशात कोरोना (Corona) विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाच राज्यांतील निवडणुका (Five State Election 2022) लक्षात घेता, रॅली, रोड शो आणि सभांवर बंदी कायम राहणार की उठवली जाईल? याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्याता आहे. 22 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांमधील रॅली आणि रोड शोवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवली. मात्र, घरोघरी प्रचाराला परवानगी देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये कोविड-19 च्या परिस्थितीचा आणि कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा घेणार आहे. आयोग केंद्रीय आरोग्य सचिव, मुख्य सचिव आणि पाच राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह इतरांशीही चर्चा करेल. देशात कोविड-19 च्या परिस्थितीत सुधारणा होत असतानाही निवडणूक आयोग अद्याप बंदी उठवण्याच्या मनस्थितीत नाही, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, निर्बंधांमध्ये काही शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.
आयोगाने यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आणि 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 28 जानेवारीपासून राजकीय पक्ष आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना जास्तीत जास्त 500 लोकांच्या जाहीर सभा घेण्याची परवानगी दिली होती. 1 फेब्रुवारीपासून जाहीर सभेला परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त, प्रचारासाठी व्हिडिओ व्हॅनला COVID-19 निर्बंधांसह नियुक्त केलेल्या खुल्या जागांवर देखील परवानगी देण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना 15 जानेवारीपर्यंत रॅली, रोड शो आणि बाईक रॅली आणि अशा इतर प्रचार कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. 15 जानेवारी रोजी आयोगाने हे निर्बंध 22 जानेवारीपर्यंत वाढवले होते. त्यानंतर हे निर्बंध 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आले. मात्र, ही बंदी यापुढे कायम राहणार की नाही, ती किती दिवस वाढणार? याचा निर्णय आज निवडणूक आयोग घेणार आहे. पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत मतदान होणार आहे. पाच राज्यांतील निवडणुका 7 टप्प्यात पार पडतील. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.