सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. मात्र आता या चित्रपटातील कलाकारांबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. निर्माता साजिद नाडियादवाला आणि सलमान यांच्यातील मतभेदांमुळे आयुष शर्मा (Aayush Sharma) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. मात्र भूमिकेवरून सलमानसोबत असलेल्या मतभेदांमुळे त्याचा मेहुणा आयुष शर्माने माघार घेतल्याचं कळतंय. आयुष आणि झहीरच्या जागी आता चित्रपटात श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी झळकणार असल्याचं समजतंय. आयुषने या चित्रपटातील काही सीन्सचं शूटिंगसुद्धा केलं होतं. बॉलिवूड हंगामा या वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“कभी ईद कभी दिवालीच्या टीमने शूटिंगला सुरुवात केली. मात्र आयुष आणि सलमान खानमध्ये काही मतभेद होते. भूमिकेवरून असलेल्या मतभेदांमुळे आयुषने चित्रपटातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. आयुषने त्याच्या भागाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. मात्र आता त्याची जागा दुसरा अभिनेता घेणार आहे”, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वीच सलमानने त्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. त्यासोबतच बिग बॉस फेम शहनाज गिलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय.
बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्माला सलमानने बॉलिवूडमध्ये लाँच केलं. त्याचा ‘लव्हयात्री’ हा चित्रपट फ्लॉप ठरला. सलमानच्याच ‘अंतिम’ या चित्रपटातही त्याने काम केलं. ‘कभी ईद कभी दिवाली’सोबतच सलमानचा ‘टायगर 3’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यश राज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटात कतरिना कैफ आणि सलमानची जोडी पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.