Sangli Rain | दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटानं हिरावला

| Updated on: Oct 12, 2020 | 5:41 PM

सांगली जिल्ह्यातील खानापूर, जत, कडेगाव आणि तासगाव तालुक्याबरोबर मिरज पूर्व भागातील शेतीच मोठं नुकसान झाले आहे. पिढ्यानं पिढ्या दुष्काळाची झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांचं पावसानं मोठं नुकसान केलं आहे.

Sangli Rain | दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटानं हिरावला
Follow us on

सांगली- जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर, जत, कडेगाव आणि तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि पुलावर पाणी आले आहे. पावसामुळे सांगली जिल्ह्यातील खानापूर, जत, कडेगाव आणि तासगाव तालुक्याबरोबर मिरज पूर्व भागातील शेतीच मोठं नुकसान झाले आहे. पिढ्यानं पिढ्या दुष्काळाची झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांचं पावसानं मोठं नुकसान केलं आहे. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करुन पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. (Crops damaged in drought hit area of Sangli due to heavy rainfall farmers demands compensation)

अनेक वर्षांपासून दुष्काळानं होरपळणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर, जत, तासगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने येथील नद्यांना पूर आला आहे. खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर आला असून विजापूर-गुहागर महामार्गावरील पुलावर पाणी आले तसेच बलवडी, बेनापूर पुलावर पाणी आले आहे. अन्य ओढ्यांना सुद्धा पूर आला आहे. खानापूर तालुक्यात एक जण वाहून गेला आहे. जत तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झाला आहे. कोरडा नदीला महिन्यात दुसऱ्यांदा पूर आलेला आहे. त्यामुळे काशिलिंगवाडी-कोसारी ही गावे जोडणारा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे.कडेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि पुलावर पाणी आले आहे.

पावसामुळे सांगली जिल्ह्यातील खानापूर, जत, कडेगाव आणि तासगाव तालुक्यात आणि मिरज पूर्व भागात शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. द्राक्ष बागेत पाणी साचलं आहे तर हरभरा, भुई मूग, सोयाबीन अशा खरिपातील सर्व पिकांचं नुकसान झाले आहे. ऊस शेतीच मोठं नुकसान झालं असून ऊभा असणारा जमीनदोस्त झाला आहे. अनेक फळ बागा पडल्या आहेत. हजारो हेकटर शेतीचं या अवकाळी पावसामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात आणि आरग गाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेत शिवारं जलमय झाली आहेत. पिकेही पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेलाय. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका ऊस , सोयाबीन, मका , बाजरी , भुईमूग , खरीप पिके तसेच पालेभाज्यांना बसला असून फळ बागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोरोनानं शेतकरी संकटात असताना दुष्काळी तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, खानापूर, जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं खरिपातील सर्व पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित केले गेले पाहिजेत, सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडेंनी केली आहे.

पावसामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचं नुकसान झालं आहे. कोरोना आणि पावसामुळं झालेलं नुकसान भरुन काढण्याची क्षमता शेतकऱ्यांची राहिलेली नाही. यामुळं सरकारनं बांधावर येऊन पंचनामे करुन शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती शिवराज पाटील या शेतकऱ्यानं सरकारला केली आहे.

पावसामुळं अनेक वर्ष दुष्काळानं होरपळणाऱ्या सांगली जिल्ह्यातील, जत,आटपाडी, खानापूर,कवठेमहंकाळ, मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांवर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्याची वेळ आलीय.

संबंधित बातम्या :

Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस

(Crops damaged in drought hit area of Sangli due to heavy rainfall farmers demands compensation)