घराघरात पाणी शिरलं, आमदार राहुल कुल यांच्या गावाचाही संपर्क तुटला

| Updated on: Aug 05, 2019 | 4:24 PM

दौंड तालुक्यातील (Daund Flood) सर्वच कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दौंड तालुक्यातील (Daund Flood) नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांच्या राहू गावाचाही संपर्क तुटला आहे.

घराघरात पाणी शिरलं, आमदार राहुल कुल यांच्या गावाचाही संपर्क तुटला
Follow us on

बारामती : धरणक्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदी पात्रातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दौंड तालुक्यातील (Daund Flood) सर्वच कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दौंड तालुक्यातील (Daund Flood) नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांच्या राहू गावाचाही संपर्क तुटला आहे.

धरण क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे मुळा-मुठा नदी पात्रात सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढत आहे. मुळा-मुठा नदीने धोकादायक स्थिती आलांडली असून सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या पुल देखील पाण्याखाली गेले आहेत. दहिटणे आणि खामगाव या गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

आमदारांच्या गावाचा संपर्क तुटला

राहू-पिंपळगाव यांना जोडणारा बंधारा पाण्याखाली गेलाय. आमदार राहुल कुल यांच्या राहू गावाला जोडणाऱ्या  मोठ्या पुलाला पाणी लागल्याने सावधगिरीचा इशारा म्हणून ही वाहतूक दुपारीच बंद करण्यात आली. सायंकाळी 4 वाजता मोठ्या पुलावरून पाच वर्षाने पाणी वाहू लागल्याने राहू आणि पिंपळगावचा संपर्क तुटला.

श्री क्षेत्र संगम येथील पूल पाण्याखाली गेल्याने देलवडी-वाळकी या गावांचा संपर्क तुटला. येथे मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम झाल्याने पाण्याचा प्रवाह मोठा झाला असून पारगाव पासून पुढचे देखील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदी काठच्या गावांमध्ये साधारणतः जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करण्यात येते. पुराचे पाणी शेतांमध्ये गेल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दौंड शहरात घरात पाणी, स्थलांतराला सुरुवात

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दौंड शहरातील खाटीक गल्ली आणि ईदगाह मैदान परिसरातील घरात पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. अनेक भागातील घरांमध्ये भीमा नदीचं पाणी शिरलंय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे प्रशासनाकडून नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु

पुणे जिल्ह्यातील विविध धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाची चांगलीच संततधार सुरू आहे. त्यामुळे वीर धरणातून सुमारे 64 हजार क्यूसेक्सने नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा  देवघर, गुंजवणी ही सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. भाटघर धरण ओवरफ्लो होण्याची शक्यता आहे. वीर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो. आताच बारामती तालुक्यातील निंबुत, मुरूम, लाटे, कोऱ्हाळे खुर्द, कांबळेश्वर या ठिकाणचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नीरा आणि होळ येथील जुने पूल पाण्याखाली गेले असून वीर येथील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना जोडणारा मार्ग देखील बंद झाला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बंधाऱ्यांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.