नीरा नदीचं पात्र अजूनही कोरडं, तुकोबारायांच्या पादुकांना टँकरने स्नान
दुष्काळाने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या उत्साहावरही पाणी फेरलं. तुकोबारायांच्या पादुकांना ज्या नीरा नदीत स्नान घातलं जातं, त्या नीरा नदीचं पात्रच कोरडं पडलंय. त्यामुळे तुकोबारायांच्या पादुकांना टँकरद्वारे पाणी आणून स्नान घालावं लागणार आहे.
बारामती : राज्यात सर्वच भागात दुष्काळाने थैमान घातलंय. पाणीटंचाईने तर कहरच केलाय. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागला. आता याच दुष्काळाने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या उत्साहावरही पाणी फेरलं. तुकोबारायांच्या पादुकांना ज्या नीरा नदीत स्नान घातलं जातं, त्या नीरा नदीचं पात्रच कोरडं पडलंय. त्यामुळे तुकोबारायांच्या पादुकांना टँकरद्वारे पाणी आणून स्नान घालावं लागणार आहे.
इंदापूर तालुक्यातल्या सराटी येथून नीरा नदीचं पात्र वाहतं. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं स्नान याच नदीपात्रात होतं. मात्र गेल्या कित्येक वर्षात या नदीपात्रात पाणीच आलं नाही. दूर दूरपर्यंत या नदीपात्रात पाणीच दिसत नाही. पर्यायाने तुकोबारायांच्या पादुकांना टँकरद्वारे पाणी आणून स्नान घालावं लागणार आहे. नदीपात्रात रविवारी पादुका स्नान होईल.
जून महिना संपेपर्यंत राज्यातल्या विविध भागांना दुष्काळाचा तीव्र फटका बसला. प्रत्येक घटकाला या दुष्काळाने हवालदिल केलं. या सर्वांवर शासकीय यंत्रणांकडून म्हणाव्या अशा उपाययोजनाही झाल्या नाहीत. त्यातच पाऊस कधी येणार याची शाश्वती नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्याप नीरेचं पात्र कोरडंच आहे. त्यामुळेच नीरा स्नानासाठी टँकरचा आधार घ्यावा लागणार आहे.
पाण्याचं नियोजन नसणं, ऊसासारख्या पिकांसाठी वारेमाप पाण्याचा वापर, अधिकारी आणि राज्यकर्त्यांचे लागेबांधे यामुळे ही वेळ आल्याचा आरोप आता होऊ लागलाय. राज्यात सगळ्याच घटकांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय. यातून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळाही चुकला नाही असंच म्हणावं लागेल.