गुंडाराज! पिंपरीत पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलिसांना मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

पिंपरी चिंचवड : विद्येचं माहेरघर पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगळ केल्याचे दोन वेगवेगळे प्रकार घडलेत. सांगवीमध्ये पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. तर वाकड पोलीस ठाण्यात पोलिसाला शिवीगाळ करून धमकी देण्यात आली. वाकड पोलिसांकडे कोहिनूर हॉटेलचे व्यवस्थापक पवनसिंग सीताराम यादव […]

गुंडाराज! पिंपरीत पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलिसांना मारहाण
Follow us on

पिंपरी चिंचवड : विद्येचं माहेरघर पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगळ केल्याचे दोन वेगवेगळे प्रकार घडलेत. सांगवीमध्ये पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. तर वाकड पोलीस ठाण्यात पोलिसाला शिवीगाळ करून धमकी देण्यात आली.

वाकड पोलिसांकडे कोहिनूर हॉटेलचे व्यवस्थापक पवनसिंग सीताराम यादव यांनी ते काम करत असलेल्या हॉटेलचा भागीदार मालक सुरज देविदास कांबळे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हॉटेलचा दुसरा भागीदार आरोपी इम्तियाज याला पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले.

त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मोठमोठ्याने आरडाओरडा केला. पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत सर्व पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली. यावरून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी इम्तियाज बरकतअली आत्तार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलीस नाईक महेश विनायकराव बारकुले यांनी वाकड स्थानकात तक्रार दिली आहे.

दुसऱ्या घटनेत पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दिली आहे. बाळू सुपे नवी सांगवी पोलीस चौकीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. रविवारी ते कर्तव्यावर असताना साहेबगौडा पाटील चौकीत आला. त्याने त्याच्या मुलाची तक्रार का घेतली नाही म्हणून सुपे यांच्याशी हुज्जत घातली. तसेच छातीवर आणि तोंडावर मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्याला अटक करण्यात आली आहे.

जवळच असलेलं आयटी हब आणि शहराच्या वेगाने होणाऱ्या विस्तारीकरणामुळे पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय देण्यात आलंय. पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखता येत नसल्याची ओरड आतापर्यंत होत होती. पण इथे थेट पोलिसांनाच पोलीस स्टेशनमध्ये घुसून मारहाण व्हायला लागल्यामुळे गुंडाराज निर्माण झालंय. पोलीस सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य कोणत्या दहशतीखाली जगत असतील याची कल्पना न केलेलीच बरी.