राज ठाकरे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बातचीत, केंद्र सरकारलाही मोलाचा सल्ला

| Updated on: Apr 16, 2020 | 5:34 PM

राज ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत (Raj Thackeray suggestion on Corona).

राज ठाकरे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बातचीत, केंद्र सरकारलाही मोलाचा सल्ला
Follow us on

मुंबई : जगभरात थैमान घालणारा कोरोना महाराष्ट्रातही वाढत (Raj Thackeray suggestion on Corona) असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र, देशभरात आतापर्यंत हजार पेक्षाही जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या आजारातून यशस्वीपणे बाहेर पडता येतं. लोकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे (Raj Thackeray suggestion on Corona).

राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला काही सूचना दिल्या आहेत. याशिवाय याबाबत आपलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल बातचीतदेखील झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी या पत्रकात दिली आहे.

राज ठाकरे पत्रकात नेमकं काय म्हणाले?

कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत. बहुसंख्य नागरिकदेखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत. त्यामुळे या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत. आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्यादेखील आश्वासक आहे. या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं कौतुक करावं ते कमीच आहे.

कल्याणमध्ये तर 6 महिन्याची मुलगी या आजारातून बरी होऊन घरी आली. तिच्यासारखे हजारो जण या आजारावर मात करुन बाहेर पडले हे दिलासादायक आहे. पण या आकडेवारीला ना सरकारी पातळीवर पुरेसी प्रसिद्धी दिली जात आहे ना माध्यमांमध्ये यावर चर्चा होताना दिसत आहे. कालच मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ही बाब मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. त्यालादेखील योग्य प्रसिद्धी दिली गेली तर नागरिकांचा आपला डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास वाढेल. सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांनादेखील काहीसा दिलासा मिळेल. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवलं गेलं तर नागरिक लगेच बाहेर पडतील, असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. किंबहुना 3 मेपर्यंतच्या लॉकडाऊनचं लोक पालन करतील याविषयी शंका नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली किंवा तशी शक्यता आहे, असं जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच पण तो आपल्या सर्वांचा नुकसानकारक ठरेल. या आजाराच्या नुसत्या शंकेनेसुद्धा जर एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर लोकांचा कल आजाराची लक्षणे लपवण्याकडे राहील. पर्यायाने लॉकडानसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील.

हा आजार संसर्गजन्य आहे हे मान्य पण टी.बी. सारखे अनेक आजार संसर्गजन्य असतानादेखील आपण त्या रुग्णांना वाळीत टाकलं नाही तर आत्ताच हे का? यावर एक उपाय म्हणजे आजारावर मात केली जात आहे, रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत. याची आकडेवारी देणारं एक ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने जारी करावं. माध्यमांनीदेखील या मुद्द्याचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावं.

माझं पुन्हा एकदा जनतेला आव्हान आहे की, घाबरुन जाऊ नका, पुरेसी काळजी घ्या आणि समाजमाध्यमांवर येणाऱ्या गोष्टींची नीट खातरजमा करा. त्यावर सरसकट विश्वास ठेऊन कोणतीही आततायी कृती करु नका.

संबंधित बातम्या :

Corona | उद्धव ठाकरे सरकार फेल, महाराष्ट्रात लष्कर बोलवा : नारायण राणे

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित तीन हजारांच्या पार, मुंबईतच 2003 रुग्ण

Corona : औरंगाबादेत एका गर्भवती महिलेसह तिघांना करोना, आकडा 28 वर

टीव्ही 9 इम्पॅक्ट : एपीएमसी मार्केट कामगार, व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट घ्या, एकनाथ शिंदेंचे आदेश