‘काँग्रेसने का माफी मागावी?’, पुलवामा हल्ल्यावरुन शशी थरुर यांचा भाजपला सवाल

| Updated on: Oct 31, 2020 | 4:59 PM

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी ट्विटरवर केंद्र सरकारला उद्देशून प्रश्न विचारले आहेत (Shashi Tharoor ask question to BJP on Pulwama attack).

काँग्रेसने का माफी मागावी?, पुलवामा हल्ल्यावरुन शशी थरुर यांचा भाजपला सवाल
Follow us on

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यात (Pulwama Attack) पाकिस्तानचा हात असल्याचं पाकिस्तानचेच मंत्री फवाद चौधरी (Pak Minister Favad Choudhary) यांनी कबूल केल्यानंतर त्यावरुन भाजपने काँग्रेसला (Congress) घेरण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (31 ऑक्टोबर) गुजरातमध्ये भाषण करताना याच मुद्द्याचा धागा पकडत काँग्रेसवर निशाणा साधला. त्याआधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी ट्विटरवर केंद्र सरकारला उद्देशून प्रश्न विचारले आहेत (Shashi Tharoor ask question to BJP on Pulwama attack).

“मला समजत नाही, काँग्रेस पक्षाला काशाबद्दल माफी मागायला हवी? सरकारने सैनिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, या अपेक्षेसाठी माफी मागावी? आम्ही जवानांच्या सुरक्षेच्या मुद्द्याचं राजकारण केलं नाही म्हणून माफी मागावी? शहिदांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त केल्या म्हणून माफी मागावी?”, असे सवाल शशी थरुर यांनी केले आहेत (Shashi Tharoor ask question to BJP on Pulwama attack).

पुलवामा हल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करण्याआधी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली होती.

“पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मागे त्यांचा हात असल्याचं पाकिस्तानने स्वीकारलं आहे. आता काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशाची माफी मागायला हवी,” असं ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपच्या विविध नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने पुलवामा हल्ल्यात षड्यंत्र असल्याचा आरोप केला होता.

‘भारताला घाबरुन अभिनंदनची सूटका’

फवाद चौधरी हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्यांनी संसदेत बोलताना ही कबुली दिली आहे. पाकिस्तानने भारतात घुसून हल्ला केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो या भीतीने भारतीय पायलट अभिनंदनला सोडण्यात आल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका बैठकीत स्पष्ट केलं होतं, असा दावा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे खासदार अयाज सादिक यांनी संसदेत केला होता, असंही जावडेकर यांनी सांगितलं (Cabinet Minister Prakash Javadekar).

“खासदार सादिक यांनी सांगितले की, अभिनंदनला सोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी हे भीतीने थरथर कापत होते. कारण त्यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती.” त्यावर उत्तर देताना फवाद यांनी पुलवामा हल्ला पाकिस्ताननेच केल्याची कबुली दिली. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता. पुलवामातील यश हे इम्रान खान यांच्या नेतृत्त्वातील मोठं यश होतं, असं म्हणत फवाद चौधरी यांनी त्यांचा पुलवामा हल्ल्यात हात असल्याचं स्वीकारलं होतं. भारताला निशाणा बनविणाऱ्या दहशतवाद्यांचं पाकिस्तानकडून समर्थन केलं जात असल्याचं पाकिस्तानच्या एखाद्या मंत्र्याने पहिल्यांदाच कबुली दिल्याचं भारताने म्हटलं आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते. आयईडी स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या गाडीला येऊन धडकली होती, यामध्ये मोठा स्फोट होऊन 40 जवान शहीद झाले होते (Cabinet Minister Prakash Javadekar).

संबंधित बातम्या :

अशा लोकांना जोड्यानं बडवलं पाहिजे; पाकच्या कबुलीनाम्यानंतर व्ही. के. सिंह कडाडले

लडाखजवळ LAC वरुन मागे हटण्यासाठी चीनच्या दोन अटी, भारताने लगोलग धुडकावल्या

विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता झाली नसती तर पाकिस्तानची पूर्ण ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती!, भारतीय वायूसेना होती सज्ज